“श्री स्वामी बॅग्ज’चे प्रफुल्ल जगताप, राहुल जगताप यांची माहिती
पुणे – पावसाळ्यातही कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेनकोट, छत्र्या महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे त्याची विक्री “अत्यावश्यक सेवे’मध्ये मोडते. परंतु या रेनकोटच्या उत्पादनालाच लॉकडाऊनचा फटका बसला आहे. त्यामुळे बाजारात हव्या तेवढ्या प्रमाणात रेनकोट उपलब्ध नाहीत, अशी माहिती “श्री स्वामी बॅग्ज’चे प्रफुल्ल जगताप आणि राहुल जगताप यांनी दिली.
शाळांची दप्तरे, गणवेश आणि अन्य साहित्याची तयारी या व्यापारीवर्गाकडून हिवाळ्यात म्हणजे दिवाळीदरम्यान सुरू करण्यात येते. शाळांच्या मागणीप्रमाणे बॅग्ज, गणवेशाची तयारी होते. ती झाल्यानंतर मार्चमध्ये रेनकोट बनवण्याची लगबग सुरू होते. जूनचे वेध असल्याने सुमारे अडीच-तीन महिने रेनकोटच्या उत्पादनावर लक्ष द्यावे लागते. यंदा लॉकडाऊनमुळे कामगार वर्ग उपलब्ध न झाल्याने उत्पादनाला खीळ बसली. याशिवाय मुंबई, कोलकाता येथून जो माल आणावा लागतो, तो “दळणवळण’ बंद असल्याने आणता आला नसल्याचे जगताप बंधूंनी सांगितले.
नियमांचा अडसर…
तर, उपलब्ध साहित्य विक्रीसाठी “पी1-पी2′ चाही अडसर ठरत आहे. वास्तविक रेनकोट, छत्री, प्लॅस्टिक शीट्स, कव्हर या गोष्टींचा समावेश अत्यावश्यक सेवेत केला आहे. एक दिवसाआड दुकान उघडे ठेवत असल्याने अत्यावश्यक सेवेत समाविष्ट केल्याचा काहीच उपयोग होत नाही. याशिवाय ग्राहक त्यांचे कार्यालयीन कामकाज उरकल्यानंतर संध्याकाळीच खरेदीला येतात. सायंकाळी 7 वाजता दुकाने बंद करण्याचे आदेश असताना, पोलीस 5 वाजताच ती बंद करतात. व्यापारीही पोलिसांचा मान ठेवतात. त्यामुळे “अत्यावश्यक’ सेवेत समावेश करूनही त्याचा काहीच उपयोग नसल्याची खंत इतर व्यावसायिकांनी व्यक्त केली. त्यावर प्रशासनाने तोडगा काढण्याची मागणीही या व्यावसायिकांनी केली आहे.
यंदा पीपीई किटचेही उत्पादन
रुग्णालये आणि सार्वजनिक संस्था, मंदिरे, ससून सर्वोपचार रुग्णालय, स्मशानभूमी यांच्यासाठी पीपीई किट बनवून दिले आहेत. श्रीमंत दगडूशेठ गणेश मंदिरानेही काही संस्थांना पीपीई किट दिले जे आपण त्यांना बनवून दिले आहेत. रुग्णालयांची गरज लक्षात घेता हे बनवले होते. त्यामध्ये रेनकोटचेच मटेरियल वापरावे लागते, जे “युज ऍन्ड थ्रो’ नाही. ते निर्जंतुकीकरण करून पुन्हा वापरता येते हे महत्त्वाचे आहे. त्यासाठी त्याचे सॅम्पल लॅबमधून टेस्टही करून घेतल्याचे “श्री स्वामी बॅग्ज’चे राहुल जगताप यांनी सांगितले. यालाही आता मागणी असल्याचे जगताप यांनी नमूद केले.
लहान मुलांच्या रेनकोटला यंदा मागणीच नाही
वह्या, पुस्तकांच्या खरेदीबरोबरच जूनमध्ये शाळा सुरू होण्याआधी दप्तरे, गणवेश आणि पुढील पावसाळ्याच्या तीन-चार महिन्यांसाठी रेनकोटची खरेदी केली जाते. यंदा करोनाच्या प्रादुर्भावामुळे मुलांना बाहेरच न काढल्याने आणि शाळाही बंद असल्याने लहान मुलांच्या रेनकोटला काहीच मागणी नसल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी फेमस कार्टुन असलेले रेनकोट दुकानांच्या बाहेर दिसतात यंदा हा “ट्रेन्ड’च दुकानदारांना आणता आला नाही, असे यावेळी जगताप यांनी सांगितले.