भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा
कोलकाता – भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला दोन वर्षांपूर्वी झालेल्या कसोटी मालिकेत पराभूत करत ऐतिहासिक कामगिरी केली होती. यंदाही त्याच कामगिरीची पुनरावृत्ती व्हावी, अशी अपेक्षा बीसीसीआयचे अध्यक्ष व माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी व्यक्त केली आहे.
गतदौऱ्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात पराभूत करण्याची किमया साधली होती. यंदाही तीच अपेक्षा आहे. अर्थात, यावेळचा दौरा जास्त आव्हानात्मक असेल. करोनामुळे क्रिकेटपटू सध्या सरावापासून तसेच सामन्यांपासून लांब आहेत. इतक्यात अन्य कसोटी मालिकादेखील त्यांना सरावासाठी खेळायला मिळणार नसल्याने थेट ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्यांवर सरस कामगिरी करणे निश्चितच आव्हानात्मक राहील.
गेल्या मालिकेत त्यांच्या संघात स्टिव्ह स्मिथ व डेव्हिड वॉर्नर नव्हते. त्यामुळे त्यांची फलंदाजी कमकुवत होती. यावेळी मात्र हे दोघेही संघात आहेत. त्यामुळे भारतीय गोलंदाजांना त्यांच्यावर सातत्याने प्रत्येक डावात वर्चस्व राखावे लागेल, तरच संघाच्या विजयाच्या मार्गातून मोठा अडसर दूर होईल, असेही गांगुलीने सांगितले. या मालिकेपूर्वी भारतीय संघ त्यांच्याच विरुद्ध टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.