अकोले -वर्षभरात सुमारे दोन महिनेच वाहतुकीसाठी खुला राहिलेला मुळा नदीवरील कोतूळचा पूल पाण्याखाली गेला आहे. पाचनई, हरिश्चंद्रगड व परिसरातील पावसामुळे मुळा नदी वाहती झाली असून पिंपळगाव खांड हे धरण लवकर भरण्याची आशादायक स्थिती निर्माण झाली आहे.
मुळा पाणलोट क्षेत्रात आंबित धरण आठ दिवसापूर्वी भरल्याने मुळा नदी वाहती झाली होती. त्यात मंगळवारी मुळा पाणलोट क्षेत्रात सायंकाळी जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने पिंपळगाव खांड धरणात चांगली आवक झाल्याने आज बुधवारी सकाळी कोतूळ येथील मुळा नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे.
पूल पाण्याखाली गेल्याने 12 ते 15 गावांचा कोतूळशी संपर्क तुटला आहे. मुळा नदीला मोठ्या प्रमाणात पूूूर आला आहे. मागील वर्षी कोतूळ ते अकोले या रस्त्यावरील मुळा नदीवरील पिंपळगाव खांड धरणाच्या फुगवटा पाण्यामुळे सुमारे दहा महिने पाण्याखाली गेलेला हा पूल 29 एप्रिलला वाहतुकीसाठी खुला झाला होता. मात्र फक्त दीड महिनाच हा पूल वाहतुकीसाठी सुरु राहून तो आता वाहतुकीसाठी पुन्हा बंद झाला आहे.पुलावर पाणी आल्याने पांगरी, पोरेवाडी, पिंपळगाव खांड या भागातील नागरिक व शालेय विद्यार्थ्यांना पांगरी, मोग्रस, धामणगाव पाट असा सुमारे पंधरा किलोमीटर प्रवास करून कोतूळ येथे यावे लागणार आहे.
दरवर्षी पुलावर पाणी राहत असल्याने या परिसरातील नागरिकांची कुतर ओढ होते. तर काही वेळा या नदीवर विनापरवाना सुरु असलेल्या होड्या मधून धोकादायक स्थितीत प्रवास करावा लागतो. बुधवारच्या आठवडे बाजारास जाण्यासाठी महिला व नागरिकांना कसरत करावी लागते. मुळा नदीवरील पिंपळगाव खांड धरण बांधताना हा पूल पाण्याखाली जाणार व कोतूळ ते अकोले ही वाहतूक विस्कळीत होणार हे माहीत असतानाही धरण बांधताना याबाबत आघाडी शासनाने कोणतीही उपाय योजना केली नव्हती. व याचे पर्यावसन कोतूळची बाजार पेठ उध्वस्त होण्यात झाले.
त्यामुळे कोतूळ गावातील तरुणांनी एकत्र येऊन धरणग्रस्त कृती समिती स्थापन केली. त्या माध्यमातून युती शासन काळात याचा पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला यश येऊन या पुलाला मजुरी मिळाली व कार्यारंभ आदेश देखील निर्गमित झाला. या उन्हाळ्यात प्रत्यक्ष काम चालू होणे अपेक्षित होते. प्रत्यक्ष कामाला सुरवात झालेली नाही. यामुळे कोतूळ परिसरात नाराजीचा सूर उमटत असून पुलाचे काम कधी सुरु होणार याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.