नंदुरबार – राज्यात भाजपला एकाकी पाडत कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना एकत्र आले. सरकार स्थापनेला आता जवळपास अडीच वर्षे झाली आहेत. मात्र महाविकास आघाडीतील अंतर्गत नाराजी अजूनही संपलेली नाही. वेळोवेळी निधीवरून तर कधी महामंडळाच्या वाटपावरून नाराजी बाहेर आली आहे.आता पुन्हा निधीवरून कॉंग्रेसची खदखद बाहेर आली आहे.
कॉंग्रेसचे मंत्री के. सी. पाडवी यांनी आदिवासी खात्याला मिळणाऱ्या तोकड्या निधीवरून नाराजी व्यक्त केली आहे. यादर्भात ते कॉंग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना बोलणार असल्याची माहितीही समोर आली आहे. महाविकास आघाडीत एकमत नसल्याची टीका भाजपकडून अनेकदा होत आली आहे. दुसरीकडे भाजप महाविकास आघाडी सरकार जाईल यासाठी रोज नव्या तारखा देत आहे. अशा वेळी कॉंग्रेसची ही खदखद महाविकास आघाडीची चिंता वाढवणारी आहे.आदिवासी विकास मंत्री ऍड. के.सी पाडवी यांची खात्याला मिळत असलेल्या कमी निधीबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
आणखी एका कॉंग्रेस मंत्र्यांच्या गाऱ्हाणाने महाविकास आघाडीतील दुफळी बाहेर आली आहे. के. सी. पाडवी यांच्या सागंण्यानुसार इतर विभागांना आस्थापना खर्च हा जनरल बजेट मधून मिळतो. तर आदिवासी विकास विभागाला मात्र विकासाच्या निधींमधून हा खर्च करावा लागत आहे. त्यामुळे आदिवासी विभागावर आर्थिक ताण पडत आहे. आदिवासी बांधवांचा विकास थांबवून पगार द्यावा लागत आहे, असेही पाडवी म्हणाले आहेत.
एकीकडे आस्थापना खर्च वाढतच आहे, तर दुसरीकडे निधी नाही, त्यामुळे आदिवासी खाते फक्त पगार वाटप करणार खाते म्हणून शिल्लक उरेल अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.