सातारा – क्वारंटाइन कालावधीचा भंग करणाऱ्या आरोग्य निरीक्षकांना राजकीय अभय मिळाले आहे. पालिकेने कारवाईचा हात आवळल्याने कर्मचारी वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. साधा खुलासासुध्दा मागवण्याचे धाडस मुख्याधिकाऱ्यांनी न दाखवल्याने प्रशासनाचा गचाळ कारभार समोर आला असून चौकटीत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे मनोधैर्य खचले आहे. पालिकेच्या आरोग्य निरीक्षकांवर सत्ताधारी सातारा विकास आघाडी व पालिका प्रशासन कोणतीच कारवाई करत नसल्याने आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना नक्की कशाची अडचण आहे, हा सातारकर जनतेला प्रश्न पडला आहे.
सातारकर नागरिकांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर विश्वास ठेवून सातारकर नागरिकांनी तीन वर्षापूर्वी सातारा पालिकेत सत्ता दिली. तीन वर्षाच्या काळात सातारकरांना विविध विकासाची काही कामे खासदार उदयनराजे भोसले यांनी आघाडीच्या माध्यमातून केलेली दिसतात. सातारा पालिकेतील सर्व पदाधिकारी मात्र आपण राजेंच्या आघाडीतून निवडून आलो आहोत, हे विसरायला लागले असल्याचे दिसून येते. आरोग्य निरीक्षकांवर कारवाई करण्याचे धाडस आघाडीतील कोणत्याच पदाधिकारी व नगरसेवकांमध्ये नसल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधित आरोग्य निरीक्षक आपल्याला एका मोठा राजकीय आश्रय असल्याच्या आविर्भावात दिवसभरात तो पालिकेत वावरत असतो.
मुख्याधिकाऱ्यांशी सख्य आणि मजबूत राजकीय लागेबांधे यामुळे आरोग्य विभागात पदाधिकाऱ्यांपेक्षा आरोग्य निरीक्षकाचा ताल वाढला आहे. कोणताही खुलासा नाही, कोणतीही नोटीस नाही, काहीच न करता मनमानी करणाऱ्या आरोग्य निरीक्षक बिनबोभाट कामावर हजर झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये पालिकेत वजनदार कर्मचाऱ्यांचेच चालते, हा संदेश गेला आहे.