कोयनानगर, {विजय लाड} – कोकणाबरोबर पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा अतिशय महत्वाचा असणारा कराड – चिपळूण हा रेल्वेमार्ग राजकीय अनास्थेमुळे मृगजळच ठरला आहे. हा बहुउद्देशीय प्रकल्प केवळ कागदावरच राहिला आहे. याबाबत पश्चिम महाराष्ट्रातील आतापर्यंतच्या सर्वच खासदारांची कामगिरी निराशाजनक राहिल्यामुळे काही वर्षांपूर्वी घोषणा व भूमिपूजन होऊनही हा प्रकल्प बासनात गेल्याने कराड व पाटण तालुक्यातील नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
कराड-चिपळूण रेल्वेमार्ग झाल्यास कोकण व पश्चिम महाराष्ट्र जोडला जावून त्याचा फायदा प्रवाशी, पर्यटक, व्यापार आरोग्य आदी क्षेत्रांना मोठ्या प्रमाणावर होणार आहे. 103 किमीचा हा रेल्वेमार्ग असून या नवीन रेल्वेलाइन प्रकल्पासाठी राज्य आणि केंद्र सरकारचा प्रत्येकी 50 टक्के हिस्सा निश्चित करण्यात आला आहे.
याला 7 मार्च 2012 च्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यावेळी या प्रकल्पाची किंमत 928.10 कोटी रुपये होती. त्यानुसार राज्य सरकारची 50 टक्के हिश्याची रक्कम 464.05 कोटी इतकी होती. तर केंद्राने त्यांच्या हिश्याची रक्कम पुढील तीन वर्षांत द्यावी, अशी विनंती करण्यात आली होती. यादरम्यान कोकण रेल्वे महामंडळाने केलेल्या सर्वेक्षणानुसार या प्रकल्पाची सुधारित अंदाजित रक्कम 3,196 कोटी झाली आहे.
हा रेल्वेमार्ग मराठवाड्याला थेट कोकणाशी आणि इतर जिल्हे बंदरांशी जोडणारा महत्त्वाचा प्रकल्प आहे. परंतु, सरकारला या प्रकल्पाचा विसर पडला आहे. या प्रकल्पासाठी मेसर्स शापूरजी पालनजी यांची भागीदार म्हणून निवड करण्यात आली होती.
भविष्यकालीन संयुक्त उपक्रम म्हणून कोकण रेल्वे आणि शापूरजी पालनजी यांच्यादरम्यान प्रत्येकी 26 टक्के आणि 74 टक्के याप्रमाणात सहभाग निश्चितीचा करारही करण्यात आला. दरम्यानच्या काळात या प्रकल्पामध्ये शापूरजी पालनजी कंपनी सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट झाले.
त्यानंतर केंद्रीय रेल्वेमंत्री यांनी राज्य शासनाने या मार्गाची अंमलबजावणी महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत विकास कंपनीमार्फत करावी आणि राज्य शासनाने 80 टक्के भार उचलावा, असे राज्य शासनास कळविले. परंतु, राज्यासमोरील परिस्थिती पाहता समप्रमाणात केंद्र आणि राज्याने आर्थिक सहभाग उचलावा, अशी विनंती रेल्वे मंत्रालयाला करण्यात आली. यावर केंद्राकडून अद्याप काही कळविण्यात आले नसल्यामुळे हा बहुउद्देशीय प्रकल्प रखडला आहे.
या मार्गावर कराडपासून खोडशी, सुपने, विहे, मल्हारपेठ, नाडे, पाटण, येराड, कोयना रोड ही स्थानके येणार आहेत. पुढे सह्याद्री पर्वतरागांच्या बोगद्यांतून हा मार्ग खेर्डी (चिपळूण) येथे कोकण रेल्वे मार्गाला मिळणार आहे. या मार्गामुळे कोकण व घाटमाथा रेल्वेने जोडण्यास मदत होणार असून देशाच्या कानाकोपर्यातील प्रवासासह मालवाहतूकीसाठी हा मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे.
केवळ पृथ्वीराज चव्हाणांकडून पाठपुरावा
कराड-चिपळूण हा बहुउद्देशीय रेल्वे प्रकल्प होण्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सोडले, तर लोकसभेत प्रतिनिधित्व करणार्या पश्चिम महाराष्ट्रातील सर्व लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाचा पाठपुरावा केला नाही. या बहुउद्देशीय रेल्वे प्रकल्पाच्या बाबतीत सर्व लोकप्रतिनिधी मुग गिळून गप्प बसण्याचे हे काम रखडले आहे. यामुळे कराड व पाटण तालुक्यातील जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे.
कराड-चिपळूण हा राजकीय उदासिनतेमुळे मृगजळ ठरलेल्या रेल्वेमार्गाचा प्रश्न आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात घेणार आहोत. तसेच कराड व पाटण तालुक्यातील जनतेच्या अस्मितेसाठी हा प्रश्न आपण सोडविण्यासाठी आपण यशस्वी पाठपुरावा करणार आहोत. – आ. शशिकांत शिंदे (सातारा लोकसभा उमेदवार – महाविकास आघाडी)