कटक- पहिल्या टी-20 सामन्यात झालेल्या दारुण पराभवानंतर भारतीय संघ दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध धडाकेबाज पुनरागमन करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल. या सामन्यात वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत कर्णधार ऋषभ पंतची नेतृत्त्वाची कसोटी होणार आहे. तसेच विजयासाठी भारतीय गोलंदाजांकडून सुधारित कामगिरीची अपेक्षा आहे.
दिल्लीमधील अरुण जेटली स्टेडिअमवर झालेल्या सामन्यात रुसी वॅन दर दुसेन व डेव्हीड मिलर यांनी तब्बल 212 धावांचा यशस्वी पाठलाग केला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी खराब कामगिरी केली. हे पाहता दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघात बदल होण्याची शक्यता आहे. या सामन्यात अर्शदीप सिंह किंवा उमरान मलिक यांना पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता आहे.
पहिल्या टी 20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी हर्षल पटेलची गोलंदाजी फोडून काढली. हर्षल पटेलच्या एका षटकात 22 धावा वसूल केल्या होत्या. त्यामुळे हर्षल पटेलच्या जागी अर्शदीप सिंह किंवा उमरान मलिकला संधी मिळू शकते. याशिवाय अक्षर पटेलच्या जागी युवा रवी बिश्नोईला संधी मिळण्याची शक्यता आहे. डेथ ओव्हरमध्ये भारतीय गोलंदाजी कमकुवत जाणवत होती. अखेरच्या आठ षटकात दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी तब्बल 110 धावा वसूल केल्या होत्या.
दरम्यान, भुवनेश्वर कुमार आणि आवेश खान यांची प्लेईंग 11 मधील जागा निश्चित मानली जात आहे. पॉवरप्लेच्या षटकात भुवनेश्वर कुमारने अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली होती. तर पहिल्या षटकात महागडा ठरणाऱ्या आवेश खान याने अखेरच्या तीन षटकात टिचून मारा केला होता. अर्शदीप डेप्थ ओव्हरमध्ये चांगला पर्याय मानला जाऊ शकतो.
दुसरीकडे फलंदाजांनी आपली भूमिका चोख बजावली होती. ईशान किशन आणि ऋतुराज गायकवाड यांनी दमदार सलामी दिली होती. त्यानंतर श्रेयस अय्यर, ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्या यांनीही प्रभावी फलंदाजी केली होती. त्यामुळे फलंदाजीत बदल होण्याची शक्यता कमीच आहे. या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघ विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल.