टेल टू हेड पद्धतीने पाणी वाटप होणे गरजेचे होते
पळसदेव – खडकवासला कालव्याच्या पाण्यापासून इंदापूरकरांना डावलण्याचा प्रकार अद्यापही संपुष्टात आलेला नाही. एकीकडे समाधानकारक पाऊस न झाल्याने विहिरींच्या पाणी पातळीने तळ गाठलेला आहे. दुसरीकडे कालव्याच्या पाण्याकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले आहे. खडकवासला कालव्याचे आवर्तन इंदापूर तालुक्यात पोहोचताच बंद झाल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.
टेल टू हेड पद्धतीने पाणी वितरणाची कार्यपद्धतीचा अवलंब करणे गरजेचे असताना, प्रत्यक्षात मात्र बारामती व दौंड तालुक्यात पाणी वाटप करण्यात येत आहे. अधिकाऱ्यांच्या या कार्यपद्धतीवर नेमका कोणाचा दबाव आहे असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. इंदापूरकरांच्या हक्काचे पाणी मिळविण्यासाठी नेत्यांचे वजन कमी पडत असल्याने शेतकऱ्यांना संघर्ष करण्याची वेळ आली असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
पुण्यालगतच्या खडकवासला धरणसाखळीत पावसामुळे पाणीसाठा वाढल्यानंतर खडकवासला धरणातून 24 जुलैला कालव्याचे आवर्तन सुरू करण्यात आले. कालव्याचे पाणी इंदापूर तालुक्यात पोचण्यासाठी 1 ऑगस्ट दिवस उजाडला. या आवर्तनातून टेल टू हेड पद्धतीने पाणी वाटप होणे गरजेचे असताना, प्रत्यक्षात मात्र दौंड तालुक्यातील वरवंड येथील तलाव व बारामती तालुक्यातील शिर्सुफळ तलावात पाणी सोडण्यात आले. इंदापूरात पाणी पोहोचताच एका दिवसात बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त
होत आहे.
तलाव, बंधारे कोरडे
पळसदेव, भादलवाडी, पोंदवडी, मदनवाडी, तरंगवाडी, गागरगाव, बळपूडी या मोठ्या तलावांशिवाय शेकडो बंधारे व अनेक छोटे पाझर तलाव खडकवासला कालव्याच्या आवर्तनातून भरता येतात. सध्या हे तलाव बंधारे कोरडे पडले आहेत. पळसदेवच्या तलावात अगदी थोडाच पाणीसाठा शिल्लक आहे. तो देखील या तलावात काही शेतकऱ्यांनी माती उचलली आहे त्या खड्ड्यांतकाही प्रमाणात पाणीसाठा आहे. परिणामी काही गावांच्या पाणीपुरवठा योजना अडचणीत आल्या आहेत. विहीर, कुपनलिकांच्या पाणी पातळीने तळ गाठला आहे. शेतकऱ्यांची शेततळी रिकामी झाली आहेत. यामुळे कालव्याचे आवर्तन तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आहे.
रिमझिम पावसावर पेरणीचे धाडस
जुलै महिन्यात झालेल्या रिमझिम पावसाच्या खडकवासला कालव्याच्या पाण्याच्या आशेवर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरणीचे धाडस केले आहे. आतापर्यंत सरासरी क्षेत्राच्या सुमारे 74 टक्के क्षेत्रावर खरीपातील बाजरी, मका यांसारख्या पिकांची शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. तालुक्यात पावसाच्या सरासरी प्रमाणापैकी केवळ 27 टक्के पाऊस बरसल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे. सध्या पाऊस गायब झाला आहे. यामुळे खरिपातील पिके, उसाची लागवड यांसाठी पाण्याची आवश्यकता आहे. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने खडकवासला कालव्याचे आवर्तन महत्वाचे आहे.