पुणे – सन्मित्र संघाने गेल्या शंभर वर्षांमध्ये केवळ खेळाडू घडविले नाहीत तर अस्सल भारतीय मातीतील खेळांना नवीन ओळख निर्माण करून दिली आहे. अशा प्रकारच्या संघाची देशाच्या विविध भागांमध्ये खेळाडू घडविण्यासाठी गरज आहे. सन्मित्र संघाचे केवळ खेळाडूंसाठीच नव्हे तर क्रीडा क्षेत्रासाठी अतिशय महत्त्वपूर्ण योगदान आहे, असे मत भारताचे माजी कसोटीपटू चंदू बोर्डे यांनी व्यक्त केले.
सन्मित्र संघाच्या शताब्दी महोत्सवात विविध खेळातील प्रशिक्षक आणि खेळाडूंचा बोर्डे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. पुना डिस्ट्रिक्ट अँड मेट्रोपॉलिटिन बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे, सन्मित्र संघाच्या शताब्दी महोत्सव समितीचे अध्यक्ष बाळासाहेब साने, सन्मित्र संघाचे अध्यक्ष माणिकराव हळबे, कार्याध्यक्ष दिवाकर निमकर, सचिव शिरीष मोरे, वसंत कुलकर्णी आदी यावेळी उपस्थित होते. बाळासाहेब साने यांनी प्रास्ताविक केले. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ, शिरीष मोरे यांनी आभार मानले.
गौरवण्यात आलेले प्रशिक्षक व खेळाडू
आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू केदार जाधव, सुरेखा द्रविड, हेमंत टाकळकर, आंतरराष्ट्रीय खो- खो प्रशिक्षक राजेंद्र साप्ते , संघटक रामभाऊ वैद्य, बाबा राहीरकर, अनंत खेडकर व क्रीडासंकुल विभाग प्रमुख समीर चुनेकर, डॉ. मनीष पटवर्धन, रोहित चौधरी, देवकी तांबे, मधुरा तांबे, व्यवस्थापक आणि प्रशिक्षकांचा यावेळी सन्मान करण्यात आला.