मोरगाव, (वार्ताहर) – बारामती तालुक्याच्या पश्चिम भागात सध्या लोकसभा निवडणुकीनंतरही भविष्यात शेतीस मिळणाऱ्या पाण्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. निवडणूक कोण येणार यावर नवतरुणांमध्ये पैजा लागल्या आहेत.
मात्र, भविष्यात होणाऱ्या मूलभूत शेत सिंचन सुविधांमुळे या भागाचा कायापलट याबाबतही ग्रामीण पट्ट्यातील तरुणांसह अबालवृद्धांना आशा वाट आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट विरूध्द राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात ही निवडणूक झाली. या लोकसभा निवडणूक रंगली ती आरोप प्रत्यारोपांच्या फैरी तसेच विकास कामांचे मुद्दे.
तालुक्याच्या पश्चिम भागातील आंबी बु, आंबी खुर्द, जोगवडी, मोरगाव, तरडोली, लोणी भापकर, माळवाडी, जळगाव कप, आदी बावीस गावे ही कायम जिरायती भाग म्हणून दुर्लक्षित आहेत.
याच गावांसाठी पिण्याचे पाण्यासह शेत सिंचनाच्या पाण्याची ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी दिले आहे. अन् याचीच चर्चा तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये सध्या सुरू आहे. विकास कामांमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पारडे जड असले तरी तुतारीच्या नव्या संकल्पना नवतरुणांसह, ज्येष्ठ नागरिकांनी शरद पवार गटाला साथ दिली असल्याची चर्चा आहे.
मात्र, सध्या सोशल मिडीयावर फिरत आहे तो तालुक्याच्या पश्चिम भागातील शेत सिंचन प्रश्न, तालुक्याच्या पश्चिम भागातील २२ गावांसाठी पिण्याच्या पाण्यासह, शेती सिंचनाचा कायमचा प्रश्न मिटवण्याची अजित पवार यांनी घोषणा सासवड येथील सभेमध्ये केले होते.
या भागातील गावांसाठी वीर धरणाचे अथवा नीरा नदीवरून पाणी उचलून देण्याचे आश्वासन दिले असल्याने या भागाचे नक्की सुजलम सुफलाम होणार. निरा नदीचे जाणारे वेष्टेज पाण्यातुन नाझरे धरण व बंधारे भरणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी करुन लोकांच्या जिव्हाळ्यच्या प्रश्न व्यवस्थित हाताळला आहे.
पाण्याचा प्रश्नच…
यामुळे निवडणुकीची आचारसहिता संपण्याची व येणाऱ्या पावसाळ्याची वाट या भागातील शेतकऱ्यांसह तरुण वर्ग पहात आहे. वास्तविक गेले अनेक वर्ष पाण्याचा प्रश्न व राजकारण या भोवती पवारांनी गेली ४० वर्षे राजकारण केले आहे. यामुळे अजित पवार तरी आपल्याला पाणी देतील का हा प्रश्न सर्वच तरुणांसह आबालवृद्धांपुढे सध्या तरी अनुत्तरित आहे.