जामखेड – तालुक्यातील खर्डा येथील मदारी समाज बांधवांसाठी महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने राबविण्यात येणारी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी सबंधित सर्व यंत्रणांशी चर्चा करण्यात येऊन दोन महिन्याच्या आत बैठक घेण्यात येईल, असे लेखी आश्वासन जामखेडचे तहसिलदार विशाल नाईकवाडे व गट विकास अधिकारी परसराम कोकणे यांनी दिल्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेले तहसिल कार्यालयासमोरील पाल ठोको आंदोलन मागे घेण्यात आले.
अतिउच्च दाबाच्या वीज वाहक तारांच्या अडथळ्यामुळे खर्डा येथील मदारी वसाहतीसाठी यापूर्वी निवडण्यात आलेली गट नंबर 1186/2 मधील एक हेक्टर जागा बदलून खर्डा ग्रामपंचायतीने गटनंबर 1141 मधील 1 हेक्टर जागा प्रस्तावित करण्याबाबतची कार्यवाही पूर्ण केली असून तसा प्रस्ताव सादर केलेला आहे. सदर जागेसाठी जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी मिळताच सुधारित अंदाज पत्रक तयार करून अतिरिक्त निधीबाबतचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यात येईल, असे या पत्रात म्हटले आहे.
घर देता का घर असा सवाल उपस्थित करीत खर्ड्यातील मदारी समाज बांधवांनी सोमवारी सकाळी 11 वाजता आ. रोहित पवार यांच्या संपर्क कार्यालयासमोर मदाऱ्याचा खेळ केला तर तहसिल कार्यालयासमोर आपले कुटुंबीय व संसार घेऊन पाल ठोको आंदोलन सुरू केले होते. ग्रामीण विकास केंद्र जामखेड, लोकाधिकार आंदोलन आणि वंचित बहुजन आघाडीच्या संयुक्त विद्यमाने पुकारलेल्या आंदोलनाचे नेतृत्व आदिवासी भटके विमुक्त आघाडीचे राज्य सह समन्वयक ऍड. डॉ. अरुण जाधव यांनी केले.