सातारा -छत्रपती शिवराय हा आदराचा व प्रेरणादायी विषय आहे. त्यांच्याविषयी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. राज्यपालांनी आपल्या पदाची उंची ओळखून बोलायला हवे. त्यांनी आपले विधान त्वरित मागे घ्यावे, अशी संतप्त प्रतिक्रिया खा. उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे.
समर्थ रामदास स्वामी यांच्याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांना कोण विचारेल, असे वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले. त्यावर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया येत असून, नव्या वादाला सुरुवात झाली आहे. औरंगाबाद दौऱ्यावर असताना कोश्यारी यांनी केलेल्या या वादग्रस्त विधानावर खा. उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया व्यक्त करून आपल्या रोषाला वाट मोकळी करून दिली आहे. खा. उदयनराजेंनी ट्विट करून राज्यपालांवर निशाणा साधला. “राष्ट्रमाता जिजाऊ याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या खऱ्या गुरू होत्या, रामदास हे कधीही गुरू नव्हते, हा खरा इतिहास आहे.
औरंगाबादमधील एका कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांचा संदर्भ देऊन महाराजांचा अपमानच केला आहे. त्यामुळे शिवप्रेमींमधून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. खरे तर राज्यपालांनी आपल्या पदाची मर्यादा ओळखून वक्तव्य करायला हवे होते. त्यांच्या वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांनी हे वक्तव्य त्वरित मागे घ्यावे’, असे ट्विट उदयनराजेंनी केले आहे.