सातारा – जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्व समावेशक पॅनेलची रणनीती निश्चित झाली असली तरी उमेदवारांची नावे गुलदस्त्यात ठेवली आहेत.
दिवाळीनंतर पक्षाचे नेते शरद पवार या पॅनेलमधील नावांवर शिक्कामोर्तब करतील, असा अंदाज असून या पॅनेलमधून कोण मातब्बर वगळले जाणार आणि कोणत्या नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार, याबाबत राजकीय गोटात उत्सुकता आहे. माणधील गोरे बंधुंची दोन पॅनेल रिंगणात असण्याच्या शक्यतेने निवडणुकीच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत.
अर्ज माघारीच्या यादीत कोणाला बसवायचे आणि कोणत्या उमेदवारांचे नाव अंतिम करायचे, याबाबतची महत्वपूर्ण बैठक पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती आहे. या रणनीतीचा रोडमॅप विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी अंतिम केला असून थोरल्या पवारांच्या मान्यतेची प्रक्रिया फक्त बाकी आहे.
जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सत्ताधारी गटाचे नेतृत्व रामराजे नाईक- निंबाळकर यांच्याकडे असून राष्ट्रवादीच्या समावेशक पॅनेलची नावे, गोरे बंधूंच्या दोन पॅनेलची नाकेबंदी व महत्वाकांक्षी इच्छुकांना चुचकारण्याचे काम दिवाळीनंतरच्या दोन दिवसांत राष्ट्रवादीच्या धुरिणांना करावे लागणार आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक निश्चित झाली आहे. राजकारणविरहित पॅनेल ठरवतानाही कोणाला काय द्यायचे आणि कोणाला कसे सोबत घ्यायचे याचे निर्णय रामराजेंच्या हाती असणार आहेत. खासदार उदयनराजे भोसले यांनी यावेळी तीन जागांची मागणी केली होती.
तर सर्वसमावेशक पॅनेलमध्ये सन्मानाने जागा मिळाव्यात अशी अपेक्षा कॉंग्रेसने केली आहे. अन्यथा कॉंग्रेस पक्ष स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे. शिवसेनेनेही बॅंकेत जागा मिळाव्यात, अशी मागणी केली आहे. मात्र, पक्षविरहित निवडणूक व समावेशक पॅनेलची चर्चा घडवत राष्ट्रवादीने महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना झुलवित ठेवले आहे.
राष्ट्रवादीच्या बैठकीत घटक पक्षांना न्याय देण्याचीही चर्चा होणार असून वरिष्ठ पातळीवर कॉंग्रेस व शिवसेना यांच्याशीही महत्वपूर्ण चर्चा करण्याचे मान्य करण्यात आले आहे.
जिल्हा बॅकेच्या आखाड्यात 18 जागांसाठी 219 अर्ज असून अर्ज माघारीची मुदत दहा नोव्हेंबरपर्यंत आहे.
तत्पूर्वी कोणाचा पत्ता कापायचा आणि कोणाचे प्यादे पुढे सरकावायाचे याच्या गोपनीय बैठकी गाठीभेटी सुरु आहेत. रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील तसेच राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची रणनीती जवळपास निश्चित झाली असून त्यावर शरद पवार यांची मोहोर उठविली जाणार आहे. इच्छुकांच्या तलवारी म्यान करताना राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचा मात्र कस लागणार आहे.
पालकमंत्री बाळासाहेब पाटील व ऍड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी सोसायटी मतदारसंघात अर्ज कायम ठेवल्याने माघार कोणी घ्यायची हा प्रश्न राजकीय प्रतिष्ठेचा ठरला आहे. पण राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या नेत्यांना हा तिढा काळजीपूर्वक सोडवावा लागणार आहे. बॅंकेत राष्ट्रवादीचे बहुमत आहे. जिल्हा बॅंकेचे नेतृत्व करताना रामराजेंना लक्ष्मणराव पाटील आणि आ. शिवेंद्रसिंहराजेंची या दोन नेत्यांची साथ मिळाली. त्यामुळे रामराजेंनी बॅंकेवरील आपली पकड मजबूत ठेवली आहे.
रामराजेंनी बाळासाहेब पाटील, शिवेंद्रसिंहराजे, आमदार मकरंद पाटील यांना कोठेही नाराज केले नाही. जिल्हा बॅकेत भाजपचे आमदार जयकुमार गोरे व खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी व शिवसेनेचे शेखर गोरे यांनी स्वतंत्र पॅनेलची घोषणा केली आहे. या पॅनेलचे राजकीय भवितव्य आणि त्याचे चेहरे दिवाळीनंतर समोर येणार आहेत. त्यामुळे हे पॅनेल राष्ट्रवादीला किती टक्कर देणार हा औत्सुक्याचा विषय आहे.
उदयनराजेंच्या दबावतंत्रालाही गती
यंदा दुग्धविकास व गृहनिर्माण मतदारसंघामधून अर्ज भरलेल्या खासदार उदयनराजे भोसले यांना बाजूला ठेऊनच राष्ट्रवादी व भाजपने डावपेच लढविले आहेत. उदयनराजे जिल्हा बॅंकेत दोन वेळा संचालक म्हणून निवडून गेले आहेत. त्यावेळी त्यांच्यामागे राष्ट्रवादी कॉंग्रेसची ताकद होती. मात्र, पक्षविरहित पॅनेलच्या प्रक्रियेत अगदीच ठरवून बाजूला ठेवण्यात आल्याने उदयनराजे यांनी आपले राजकीय दबावतंत्र गतिमान केले आहे. त्याचा साऱ्या घडामोडींवर काय परिणाम होतो, ते महत्त्वाचे ठरणार आहे.