नगर -नगर शहरातील वाहतूक कोंडीवर पर्याय असलेल्या उड्डाणपुलाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. संरक्षण मंत्रालयाच्या पातळीवर अडलेल्या तांत्रिक मुद्यावर संरक्षण मंत्रालयाकडून ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.
खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी ही माहिती दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सकारात्मक धोरणामुळे हे शक्य झाल्याची भावना खासदार डॉ. विखे पाटील यांनी स्पष्ट केली. संरक्षण मंत्रालयाकडून बहुप्रतिक्षित असलेले उड्डाणपुलाच्या कामासंदर्भात ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाले असल्याने उड्डाणपुलाच्या कामासाठी आता केवळ नॅशनल हायवे ऍथॉरिटी ऑफ इंडियाला वर्क ऑर्डर काढण्याची औपचारिकता पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. पुढील महिन्यात कामास प्रत्यक्ष सुरुवात होईल, असा विश्वास खासदार डॉ. विखे पाटील यांनी व्यक्त केला.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, रस्ते व महामार्ग विकासमंत्री नितीन गडकरी यांनी संरक्षण दलाच्या अधिकाऱ्यांसमवेत घेतलेल्या बैठकीची ही फलनिष्पत्ती असल्याचेही विखे पाटील म्हणाले. उड्डाणपुलाचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर नगर-औरंगाबाद व नगर-पुणे, या मार्गांवर दळणवळण वाढून नगरच्या विकासास त्याचा हातभार लागेल, असा विश्वासही खासदार विखे पाटील यांनी व्यक्त केला.
आता प्रतीक्षा संपणार…!
उड्डाणपुलाच्या प्रत्यक्ष कामासाठी आवश्यक असलेले संरक्षण खात्याचे ना-हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर कामांमध्ये कुठल्याच प्रकारची अडचण नसेल. त्यामुळे नॅशनल हायवे ऍथॉरिटी ऑफ इंडियाकडून हे काम पुढील महिन्यात सुरू होईल, अशी खात्री खासदार विखे पाटील यांनी व्यक्त केली.