नगर -करोनामुळे संपूर्ण देश अडचणीत आला. त्याकाळात कोणत्याही बदल्या व पदोन्नती करू नये, असे शासनाचे स्पष्ट निर्देश असताना अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेत गेल्या चार महिन्यांत संशयास्पदरित्या बदल्या व पदोन्नत्या करण्यात आल्या आहेत. त्याची तातडीने चौकशी करुन संचालक मंडळावर कारवाई करावी, अशी मागणी प्राथमिक शिक्षक सदिच्छा मंडळातर्फे करण्यात आली आहे.
सदिच्छा मंडळाचे जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर माळवे व कोपरगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी जिल्हा उपनिबंधक अहमदनगर यांना समक्ष भेटून निवेदन देऊन मागणी करण्यात आली.
करोनाच्या काळात बॅंकेत मोठ्या प्रमाणात बदल्या करण्यात आल्या. ज्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या होऊन एक वर्षही पूर्ण झाले नाही, त्यांना पुन्हा पूर्वीच्याच ठिकाणी नेमणुका देण्यात आल्या. मग यापूर्वी बदली करुन बॅंकेचा पैसा का खर्ची घालण्यात आला? कर्मचाऱ्यांच्या गैरसोयीच्या बदल्या करायच्या व नंतर “अर्थ’पूर्ण लाभ होताच त्याची पुन्हा सोय केलेली दाखवायची हा किळसवाणा प्रकार गेल्या पाच वर्षांपासून सुरु असल्याचा आरोप सदिच्छाचे जिल्हा कार्याध्यक्ष माळवे यांनी केला.
सत्य बाहेर येण्यासाठी “नार्को’चाचणी करा!
शिक्षक बॅंकेत कर्मचाऱ्यांना पदोन्नती देतानाही मोठ्या प्रमाणात अनियमितता आहे. त्यातही मोठाच “अर्थ’पूर्ण लाभ संचालक मंडळाने मिळविला आहे. या दोन्ही संशयास्पद प्रकरणांची चौकशी करुन संचालक मंडळ, बदली झालेले व पदोन्नती मिळालेले कर्मचारी यांची “नार्को’चाचणी करावी. म्हणजे सत्य बाहेर येईल, अशी मागणीही माळवे यांच्यासह, विनोद सोनवणे, रामकृष्ण काटे, बप्पासाहेब शेळके, संतोष टकले, महादेव गांगर्डे, अण्णा कांदळकर, सतीश डावरे, चंद्रकांत मोरे, बाळू मोरे, सुधाकर बोऱ्हुडे, शैलेश खणकर, सुनील झावरे, कारभारी बाबर यांनी केली आहे.