अरुण गोखले
आपल्या संस्कृतीत ध्वजास मोठा मान आहे. ध्वज, ध्वजा, निशाण, झेंडा किंवा पताका हे साधारणपणे एकाच अर्थाचे शब्द. या ध्वजाची किंवा निशाणीची कल्पना माणसाला केव्हा आणि कधी सुचली असेल? ह्याचा विचार करत अगदी मागेमागे म्हणजे आदिमानवाच्या अवस्थेपर्यंत गेले तर असा निकष काढता येईल की, त्या काळी माणूस हा टोळ्या करून राहात होता. टोळी करण्यामागे संरक्षण आणि सहकार्य ह्या दोन महत्त्वाच्या संकल्पना असल्या पाहिजेत. जर आपल्या टोळीतील कोणी माणसे हरवली, वाट चुकली, भरकटली तर त्यांना एकत्र आणण्यासाठी हातातल्या काठीला एक वस्त्र बांधून ते निशाण फडकवायचे आणि त्या संकेताने आपापला समूह एकत्र करायचा हा या ध्वजाचा किंवा निशाणाचा जन्म इतिहास असावा.
आपल्या अगदी पुरातन पौराणिक कथांमध्ये, ग्रंथ आणि पुराणांमध्ये, ऐतिहासिक कथा, बखरी आणि संदर्भ ग्रंथामध्ये ध्वजाचा उल्लेख आपल्याला आवर्जून वाचायला मिळतो. महाभारतातल्या त्या महायुद्धाचे वेळी अर्जुनाच्या रथावरील ध्वजावर साक्षात मारुती विराजमान होता हे आपण वाचले आणि ऐकलेले आहेच.
प्रत्येक ध्वजास एक स्वतंत्र इतिहास असतो. त्यासाठी झुंजणाऱ्या वीरांचे तो ध्वज, ते निशाण हे प्रेरणास्थान असते, त्यांची स्फूर्ती असते. ध्वजास ज्याप्रमाणे धार्मिक महत्त्व आहे तसेच राजकीय आणि सामाजिकही महत्त्व आहे. ती लोकांच्या एकतेची, संघटितपणाची, त्यासाठी त्याग करण्याची तयारी असलेली, दाखवलेली निशाणी आहे. ध्वजाचा सन्मान हा त्या राष्ट्राचा, त्या धर्माचा, त्या सांप्रदायाचा सन्मान आहे. यशानंतर ध्वज मोठ्या कौतुकाने फडकवला जातो.
या ध्वजाचे रंगही वेगवेगळे असले तरी त्यामागची ऐक्याची भावना आणि बळ हे एकच असते. प्रचंड मोठा समुदाय हा केवळ एका ध्वजाच्या खाली मोठ्या ताकदीने एकवटता येतो. ते सामर्थ्य ध्वजाचे असते.
मग तो देशाचा तिरंगा असो, सांप्रदायाची भगवा पताका असो, एखाद्या राजकीय पक्षाचा झेंडा असो. त्या एका ध्वजासाठी अनेकजण प्राणपणाने संघर्ष, संग्राम आणि प्रसंगी प्राणार्पणही करायला तयार असतात. आपला ध्वज हा सदैव उंच फडकत राहावा हीच प्रत्येक देशभक्ताची इच्छा असते.