जळगाव : उन्हाचा पारा आता चांगलाच वाढताना दिसत आहे. त्यातच यंदाच्या मोसमातील उष्माघाताचा पहिला बळी गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यात सध्या उष्णतेची लाट पसरली असून त्याचा फटका अमळनेर येथील महिलेला बसला असून उष्माघाताने तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. जळगावमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचले आहे.
रुपाली राजपूत असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. रुपाली या एका विवाह समारंभासाठी अमरावतीला गेल्या होत्या. रेल्वेतून प्रवास करुन त्या भर उन्हात आपल्या घरी आल्या. परंतु काही वेळातच त्यांना अस्वस्थ वाटू लागलं आणि उलट्यांचा त्रास सुरु झाला. त्रास वाढताच त्यांनी आपल्या फॅमिली डॉक्टरकडून प्राथमिक उपचार करुन घेतले होते.
त्यानंतर काही वेळासाठी त्यांना बरंही वाटू लागलं होतं. मात्र काही वेळानंतर त्यांना पुन्हा एकदा उलट्यांचा जास्तच त्रास होऊ लागला आणि त्यांची शुद्ध हरपली होती. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. मात्र तिथे पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
रुपाली राजपूत यांचे निधन झाल्यानंतर त्यांचं शवविच्छेदन केलं असता उष्माघातामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. रुपाली राजपूत या जळगाव जिल्ह्यातील यंदाच्या मोसमातील उष्माघाताच्या पहिल्या बळी ठरल्या आहेत.