महावितरणची माहिती; सातारा जिल्ह्यातील शंभर टक्के वीजपुरवठा सुरू
सातारा – कोल्हापूर व सांगली जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत थैमान घातलेल्या महापुरामुळे खंडित झालेला किंवा संभाव्य धोका टाळण्यासाठी बंद करण्यात आलेल्या सुमारे तीन लाख 15 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा मंगळवारपर्यंत सुरळीत करण्यात आला आहे. महावितरणचे अभियंते व कर्मचाऱ्यांनी पूरस्थितीतही अविश्रांत परिश्रम घेऊन वीजग्राहकांना दिलासा दिला आहे.
विविध भागांतील पूरस्थितीमुळे 44 उपकेंद्रांसह कृषी व अकृषक अशा एकूण 593 वीजवाहिन्यांवरील 17 हजार 189 वितरण रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. परिणामी सुमारे पाच लाख 70 हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा बंद पडला होता.
यामध्ये एक लाख 69 हजार कृषीपंपांसह सुमारे चार लाख शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांचा समावेश होता. पूरस्थिती ओसरल्यानंतर प्रामुख्याने सध्या पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त जवळपास सर्वच भागातील वीजपुरवठा सुरु करण्यात आला आहे. यामध्ये 76 हजार 280 कृषिपंपांसह पुणे जिल्ह्यातील एक लाख चार हजार, कोल्हापूर -एक लाख 25 हजार, सांगली- 48 हजार 250, सातारा- 22 हजार 920 तर सोलापूर- 13 हजार 660 अशा एकूण सुमारे तीन लाख 15 हजार घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर अशा अकृषक वीजग्राहकांचा समावेश आहे.
सोलापूर जिल्ह्यातील 132 ग्राहक वगळता सोलापूर, पुणे, सातारा जिल्ह्यातील शहरी भागात 100 टक्के वीजपुरवठा सुरु झाला आहे. तर ग्रामीण भागामध्ये पुणे- 112, सातारा- 3140 व सोलापूर जिल्ह्यातील 49 अशा एकूण 3301 ग्राहकांचा वीजपुरवठा सध्या बंद आहे. हे सर्व ग्राहक अतिदुर्गम तसेच डोंगराळ भागातील असल्याने तेथील वीजयंत्रणेच्या दुरुस्तीला अडथळे येत आहेत. महापुराचा मोठा फटका बसलेल्या कोल्हापूर व सांगली जिल्ह्यामध्ये पूरस्थिती ओसरत असून शहरी व ग्रामीण भागातील सुमारे एक लाख 58 हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा सुरु करण्याचे अविश्रांत प्रयत्न सुरु आहेत.
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील वीजयंत्रणेच्या दुरुस्तीचे साहित्य व कुशल मनुष्यबळ पुरविण्याचे सर्व नियोजन करण्यात आले आहे. पुणे प्रभारी प्रादेशिक संचालक सुनील पावडे गेल्या आठवडाभरापासून कोल्हापूर व सांगलीच्या दौऱ्यावर आहेत. श्री. पावडे व कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य अभियंता अनिल भोसले आवश्यक साधनसामग्रीसह अतिरिक्त मनुष्यबळ पुरविण्याचे नियोजन तसेच इतर शासकीय यंत्रणांसोबत समन्वय साधत आहेत. वीजयंत्रणेची दुरुस्ती व कार्यान्वित करण्यासाठी तांत्रिक मार्गदर्शन करीत आहेत.
पुणे, बारामती व सातारा येथील पथकांसह कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील महावितरणचे अभियंते व कर्मचारी आणि कंत्राटी कुशल कर्मचारी असे सुमारे पाच हजार अभियंता व कर्मचारी वीजयंत्रणा दुरुस्ती व वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात युद्धपातळीवर कार्यरत आहेत.