वाई – दि वाई अर्बन को. ऑप. बॅंकेच्यावतीने कोल्हापूर व सांगली येथील पूरग्रस्तांना तातडीची मदत म्हणून 25 लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे सूपूर्द करण्यात आला आहे, अशी माहिती बॅंकेचे अध्यक्ष सीए. चंद्रकांत काळे यांनी दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विटर हॅण्डलवरून बॅंकेचे कौतुक केले व तत्पर मदतीबद्दल धन्यवाद दिले.
सीए चंद्रकांत काळे म्हणाले, कोल्हापूर व सांगली परिसरात आलेल्या महापुरामुळे जनजीवन अस्ताव्यस्त झाले आहे. महापूरात लाखो लोकांचे संसार वाहून गेले आहेत. पूरग्रस्त शेतकऱ्यांची गुरे वाहून गेली आहेत. शेती पाण्याखाली गेल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. छोट्या मोठ्या व्यावसायिकांचे, व्यापाऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. त्यांना नव्याने उभे राहण्यासाठी आर्थिक पाठबळ देण्याची गरज आहे.
महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमांतून पूरग्रस्तांच्या पुर्नवसनाचे काम वेगाने सुरू आहे. त्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून वाई अर्बन बॅंकेच्यावतीने तसेच सर्व संचालकांचे मानधन, कर्मचाऱ्यांचा दोन दिवसांचा पगार एकत्र करून रूपये 25 लाख तातडीची मदत शासनाच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिली आहे. पुढील काळात सभासदांचे मतांचा विचार करून पुरग्रस्तांच्या मदतीमध्ये वाढ करण्याबाबत विचार करण्यात येईल, मात्र सध्याची महापूराची बिकट परिस्थिती पाहता बॅंकेच्या संचालक मंडळाने सर्वानुमते 25 लाखांचा धनादेश मुख्यमंत्र्याकडे देण्यात आला आहे.
याप्रसंगी बॅंकेचे उपाध्यक्ष राजेंद्र चावलानी, संचालक डॉ. विनय जोगळेकर, मदनलाल ओसवाल, ऍड. प्रतापराव शिंदे, विवेक भोसले, ऍड. सीए. राजगोपाल द्रवीड, विद्याधर तावरे, मनोज खटावकर, प्रा. विष्णू खरे, भालचंद्र देशपांडे, डॉ. शेखर कांबळे, स्वरूप मुळे, संचालिका सौ. अंजली शिवदे, सौ. गीता कोठावळे, तज्ज्ञ संचालक सीए. किशोरकुमार मांढरे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीपाद कुलकर्णी आदी उपस्थित होते.