पिंपरी – गेल्या 15 दिवसांपासूनच तापमानात तुलनेने मोठी वाढ झाली आहे. काही सेकंद जरी उन्हात थांबले तरी त्याचा चांगलाच चटका जाणवत आहे. त्यामुळे वाहनांचीही तेवढीच काळजी घेणे गरजेचे झाले आहे.
चिंचवडचे कमाल तापमान गेल्या सुमारे 15 दिवसांपासून 40 अंशांवर आहे. त्यामुळे असहाय्य उकाड्याने नागरिक त्रस्त आहेत. अशावेळी नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याबरोबरच वाहनांची काळजी घेणे आवश्यक आहे. पुण्यात इलेक्ट्रिक वाहनाने पेट घेतल्याची नुकतीच घटना घडली. त्यामुळे वाढत्या तापमानात वाहनांची काळजी घेणे गजरेचे झाले आहे. वाढत्या इंधन दरामुळे नागरिक सीएनजी आणि इलक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत. मात्र, उन्हाळ्यात या वाहनांची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.
तापमानात जास्त वाढ झाल्यास बॅटरीच्या समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे वाहन बंद पडण्याची शक्यता असते. तसेच तापमान जास्त असल्याने वाहनातील वातानुकूलन यंत्रणा सतत सुरू ठेवल्याने बॅटरीवर ताण पडतो. त्यातून बॅटरी जास्त गरम झाल्यास पेट घेण्याचीही शक्यता असते. त्यामुळे बॅटरी तपासणे आवश्यक आहे. वाढत्या इंधन दरामुळे अनेकजणांनी वाहनाना गॅस किट बसविलेले आहे. अशा वाहनांची उन्हाळ्यात काळजी घेणे आवश्यक असते.
सिमेंटचे रस्ते
सध्या शहरभर सर्वत्र सिमेंटचे रस्ते बनविण्यात आले आहेत. तसेच काही ठिकाणी हे काम सुरू आहे. सिमेंटच्या रस्त्यामुळे वाहनांचे टायर अधिक गरम होऊन टायर फुटण्याचे प्रकार घडतात. तापमानात होणाऱ्या बदलांमुळे वाहनाच्या टायरवर परिणाम होतो. त्यातून अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे उन्हात प्रवास करणे शक्यतो टाळावे. तसेच टायरमधील हवाही वेळोवेळी तपासणे गरजेचे आहे.
काय काळजी घ्यावी
उन्हात वाहनांचा वापर शक्यतो टाळावा. तसेच वाहने उन्हात पार्क करू नयेत. वाहनातील वातानुकूलित यंत्रणेचा गरज असल्यास वापर करावा. चुकून वाहनाला आग लागल्यास वाहनातून त्वरित बाहेर पडावे. टायरमधील हवेचा दबाव योग्य प्रमाणात ठेवावा.