अमृतसर – शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी संयुक्त किसान मोर्चाने शुक्रवारी भारत बंद पुकारला होता. त्याचा परिणाम प्रामुख्याने पंजाब आणि हरियाणा राज्यांत जाणवला.
पंजाब आणि हरियाणातील बऱ्याच भागांत बंदमुळे बसवाहतूक ठप्प किंवा विस्कळीत झाली. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. पंजाबमध्ये अनेक ठिकाणी बाजार आणि व्यावसायिक आस्थापना बंद राहिल्या.
काही ठिकाणी शेतकरी आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्ग रोखून धरले. पंजाबमध्ये बंदची तीव्रता जाणवली. त्या तुलनेत हरियाणात बंदला अंशत: प्रतिसाद मिळाला. पश्चिम उत्तरप्रदेशात काही ठिकाणी शेतकऱ्यांनी निदर्शने केली.
कुठला अनुचित प्रकार न घडता भारत बंद शांततेत झाल्याची माहिती सुत्रांनी दिली. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बंद पुकारण्यात आला होता. शेतमालाला किमान आधारभूत किमतीची (एमएसपी) कायदेशीर हमी मिळावी,
ही शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. आता संयुक्त किसान मोर्चा पुढील काही दिवसांत विविध बैठका घेणार आहे. त्यामध्ये पुढील रणनीती ठरवली जाईल. त्याशिवाय, संयुक्त किसान मोर्चाने आगामी काळात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.