इतर क्षेत्रांप्रमाणेच शिक्षण व्यवस्थेच्या नियोजनात अडथळे
पुणे – करोना, लॉकडाउन, संचारबंदी, शाळा व महाविद्यालये बंद यामुळे यंदाचे शैक्षणिक कॅलेंडर आणि व्यवस्थाही कोलमडली आहे. ऑनलाइन शिक्षण सुरू असले, तरी ते सर्वच विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचू शकले नाही.
“वर्क फ्रॉम होम’च्या कारणाने शिक्षक, कर्मचाऱ्यांवर कामाचे ओझे टाकले जात आहे. दरम्यान, बहुसंख्य खासगी विनाअनुदानित शाळा, महाविद्यालयांमधील शिक्षकांच्या वेतनातही कपात झाली असून काहींनी तीन-चार महिन्यांचे वेतनही थकवले आहे.
दरम्यान, करोना आटोक्यात आल्याचे पाहून शाळा, महाविद्यालये उघडली. मात्र, आता ती पुन्हा बंद करावी लागली. या चालू-बंदमुळे मानसिकताही बिघडत आहे. तर, विद्यार्थ्यांनाही शिक्षणात पूर्वीप्रमाणे उत्साह येत नसल्याचे काही पालक सांगत आहेत. पण, यावर उपाय काय? अशी चर्चा आहे. त्यामुळे सध्याची स्थिती पाहून शासनानेच योग्य धोरण ठरवणे सर्वांच्याच हिताचे ठरणार आहे.
ऑनलाइन शिक्षणही कंटाळवाणे
काही शाळा-महाविद्यालयांमधील शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी यांनाही करोनाची लागण झाली आहे. तर, काहींचा मृत्यूही झाला आहे. चालू शैक्षणिक वर्षातही अनेक बदल करण्याची वेळ ओढावली. दरवर्षी तयार करण्यात येणारा शैक्षणिक नियोजनाचा आराखडाही प्रत्यक्षात सक्षमपणे वापरात आणता आलेला नाही. ऑनलाइन शिक्षणासाठी आवश्यक मोबाइल, संगणक, लॅपटॉप, इंटरनेट कनेक्टिव्हिटी आदी गोष्टी सर्वच विद्यार्थ्यांकडे उपलब्ध असताच असे नाही. ठराविक कालावधीनंतर ऑनलाइन शिक्षणही कंटाळवाने वाटते.
अनेक शिक्षकांचे वेतन थकले
ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवल्यामुळे विद्यार्थ्यांकडे फी वसुलीचा तगादाही सुरू आहे. विद्यार्थी फी भरत नाहीत, म्हणून शिक्षकांचे काही महिन्यांचे वेतन थकले आहे. काही शाळा, महाविद्यालयांनी कपात करून तुटपूंजे वेतनही दिल्याचे प्रकार घडले आहेत. शाळा, महाविद्यालयांनी शिक्षक, कर्मचाऱ्यांपुढे शिकविण्याच्या व्यतिरिक्त इतर कामांचाही डोंगर ठेवला आहे. अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या तरी त्यावर कारवाई होत नाही. दरम्यान, खासगी शाळा, महाविद्यालयांना शासनाकडून आर्थिक मदतही करण्यात आली नसल्याचे शिक्षकांकडून सांगण्यात येत आहे.
करोनामुळे शिक्षण व्यवस्थेची पूर्ण वाट लागली आहे. ऑनलाइन शिक्षणही प्रभावी ठरतेच असे होत नाही. बहुसंख्य विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर आहेत. अभ्यासक्रम कसा पूर्ण करायचा, परीक्षा कशा घ्यायच्या, मूल्यमापन कसे करायचे याबाबत शासनाकडूनही मार्गदर्शन मिळण्याची गरज आहे.
– हरिश्चंद्र गायकवाड, अध्यक्ष, पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ
यंदाचे शैक्षणिक वर्ष हे “शून्य’ वर्षच ठरले आहे. मात्र, या वर्षातील शैक्षणिक नुकसानीची भरपाई पुढील कालावधीत करण्याचा आत्मनिर्धार सर्वांनीच करण्याची आवश्यकता आहे. करोनाचे संकट आटोक्यात यावे यासाठी सर्वांनीच योग्य ती खबरदारी घेऊन प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
– डॉ. अरुण अडसूळ, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ
शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी यांना वेठीस धरण्याचे प्रकार थांबले पाहिजेत. शासनाने प्रलंबित प्रश्न निकाली काढण्याची गरज आहे. या शैक्षणिक वर्षात शाळा, महाविद्यालयांच्या परीक्षा व्यवस्थित घेण्याचे योग्य ते नियोजन करण्याला प्राधान्य द्यावे.
– प्रा. संतोष फाजगे, सचिव, महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ