शहरात मृत्युदरही साडेचार टक्क्यांवर
पुणे – लॉकडाऊन शिथिल झाल्याने शहरातील रुग्णसंख्या वाढत असली तरी, शहरासाठी दिलासादायक आकडेवारी समोर आली आहे. शहरातील करोनाबाधित रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आता 23 दिवसांवर गेला आहे.
यापूर्वी हा कालावधी 18 दिवसांचा होता. तर शहरातील मृत्युदरही साडेचार टक्केपर्यंत खाली आहे. हा दर जून महिन्याच्या सुरुवातीला सुमारे 5 टक्के होता. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून ही माहीती जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, शहरात लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर प्रतिबंधित क्षेत्रात मर्यादित असलेला करोनाचा प्रसार या कालावधीत प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर लक्षणीयरित्या झाला असून 1 जून ते 17 जून या कालावधीत सापडलेल्या नवीन रुग्णांमध्ये सुमारे 61 टक्के रुग्ण प्रतिबंधित क्षेत्राबाहेर सापडले असल्याने करोनाचा प्रसार आता शहरभर झाला आहे.
शहरात 9 जून रोजी पहिला करोनाबाधित रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर 17 जूनपर्यंत शहरातील एकूण रुग्णसंख्या 10 हजार 643 झाली आहे. सुरुवातीच्या कालावधीत हा रुग्ण दुप्पट होण्याचा अवधी अवघ्या पाच दिवसांचा होता. त्यानंतर तो वाढत जाऊन आठ दिवस, 12 दिवस, 14 दिवस आणि त्यानंतर 16 दिवसांवर पोहोचला होता. मात्र, आरोग्य विभागाने दिलेल्या नवीन आकडेवारीनुसार, रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 23 दिवसांवर गेला आहे. त्यामुळे शहरासाठी ही दिलासादायक बाब ठरली आहे.
सक्रिय रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढला
शहरातील सक्रिय रुग्णांचा आकडा मागील आठवड्यात झपाट्याने वाढला आहे. शहरात सक्रिय बांधितांचा आकडा 11 जूनपर्यंत सुमारे 2582 (29 टक्के ) होता. मात्र, हा आकडा 17 जूनपर्यंत 3449 (32 टक्के) झाला आहे. त्यामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख़्या वाढली आहे.
प्रतिबंधित क्षेत्र घटले
व्यापारी पेठांमध्ये केलेले सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रामुळे शहरातील एकूण प्रतिबंधित क्षेत्राचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी झाले आहे. 3 मे रोजी हे क्षेत्र 9.91 चौरस किलोमीटर होते. तर 18 मे रोजी ते 10.46 चौरस किलोमीटर, 1 जून रोजी ते 9.28 चौरस किलोमीटर होते तर 17 जून रोजी हे क्षेत्र 6.64 चौरस किलोमीटरच निश्चित करण्यात आले आहे.
पावणेदोन लाखांची जूनमध्ये भर
देशात बुधवार सकाळपासून 24 तासांत तब्बल 12 हजार 881 नवे करोनाबाधित आढळले. तो एकाच दिवसातील उच्चांक ठरला. देशात सलग 7 व्या दिवशी 10 हजारांहून अधिक बाधितांची नोंद झाली. त्या वाढत्या संख्येमुळे जूनमधील 18 दिवसांत देशातील करोनाबाधितांमध्ये 1 लाख 76 हजार 411 इतक्या संख्येची भर पडली.
देशात सर्वांधिक करोनाबाधित आणि बळींची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. बाधित संख्येत देशात दुसऱ्या क्रमाकांवर असणाऱ्या तमिळनाडूने याआधीच 50 हजारांचा टप्पा पार केला आहे. बाधितांची वेगाने वाढणारी संख्या पाहता दिल्ली तमिळनाडूपाठोपाठ तो टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे. गुजरातमध्ये बुधवारीच बाधितांची संख्या 25 हजारांपेक्षा अधिक झाली आहे.