Sharad Pawar| लोकसभा निवडणुकीतील महाराष्ट्रातील शेवटच्या पाचव्या टप्प्यातील मतदान उद्या 20 मे रोजी पार पडणार आहे. राज्यातील एकूण 13 लोकसभा मतदार संघात मतदान होणार आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी विविध मुद्यांवर भाष्य करत मोठे खुलासे केले आहे.
राष्ट्रवादीमध्ये अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट निर्माण झाले. यानंतर अनेकदा दोन्ही गटांकडून आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला अद्याप मुख्यमंत्रीपद मिळालेले नाही यावरून शरद पवार यांच्यावर आरोप केले होते. त्यावर आता शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
‘२००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विधानसभेत सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री करता आला असता पण पक्ष नेतृत्वाने मुख्यमंत्रीपद काँग्रेसला दिले’, असा आरोप अजित पवार यांनी खासदार शरद पवार यांच्यावर केला होता.
काय म्हणाले शरद पवार ? Sharad Pawar|
त्यानंतर एका मुलाखतीत शरद पवार म्हणाले की, “आमच्या पक्षात मुख्यमंत्रीपदासाठी सक्षम आणि योग्य उमेदवार नव्हता. २००४ मध्ये संधी असतानाही मुख्यमंत्रीपद काँग्रेसकडे देण्याचा निर्णय अत्यंत विचारपुर्वक घेण्यात आला होता.”
पुढे ते म्हणाले, “अजित पवार त्यावेळी राजकारणात नवखे होते. त्यामुळे त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपद देण्याचा प्रश्नच नव्हता. त्यावेळी छगन भुजबळ यांच्याकडे मुख्यमंत्रीपद दिले असते तर भविष्यात पक्षात फुट पडली असती. त्यामुळेच काँग्रेसला मुख्यमंत्रीपद देऊन सर्वाधिक मंत्रीपदे घेण्याचा निर्णय घेतला,” असा खुलासा शरद पवार यांनी केला. याशिवाय शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल हे २००४ पासूनच भारतीय जनता पक्षासोबत जाण्यासाठी उत्सुक होते, असाही गौप्यस्फोट केला आहे.
…पण जनता खऱ्या पक्षांसोबत
तसेच यावेळी शरद पवार यांनी भाजपवर देखील निशाणा साधला. भारतीय जनता पक्षाने पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडले, पण जनता खऱ्या पक्षांसोबत आहे. नेते गेले असले तरी कार्यकर्ते आणि जनता महाविकास आघाडीसोबत आहे, त्याचा परिणाम या निवडणूकीत पाहायला मिळेल,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा:
‘त्यांना सावरकर नाही औरंगजेब…’ ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल