कोल्हापूर -कोल्हापूर जिल्ह्यात धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे राधानगरी, वारणा धरणांसह 11 प्रकल्पांमधून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. या 11 प्रकल्पातून प्रतिसेकंदाला 4 हजार 50 क्यूसेक पाण्याचा नदीपात्रात विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे पंचगंगा, भोगावती, कासारी, तुळशी आणि वेदगंगा नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. जिल्ह्यातील 20 बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली आहे. राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात 173 मिलिमटर, कुंभी धरण पाणलोट क्षेत्रात 195 मिलिमीटर तर पाटगाव धरण पाणलोट क्षेत्रात 190 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात अद्यापही पावसाचा जोर कायम आहे. मुसळधार पावसाने पंचगगा नदीची पाणी पातळी दिवसभरात तीन फुटांनी वाढली असून बुधवारी सायंकाळी ती 25 फूटावर येऊन पोहचली. जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील 20 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे बंधाऱ्यावरील वाहतूक इतर मार्गावर वळवण्यात आली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासांत गगनबावडा तालुक्यात 139 मिलिमीटर सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.
दोन दिवसांपासून संततधार सुरु असल्यामुळे व जिल्ह्यातील सर्वच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस असल्याने धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे पंचगगा नदीचे पात्र विस्तारलेले असून त्यामध्ये पोहण्यासाठी काही उत्साही तरुणांनी उड्या मारत आनंद लुटला. त्याचबरोबर मासेमारी करणाऱ्याची संख्याही वाढली. नदीचा परिसर पुन्हा गजबताना दिसत आहे. पहिल्याच पावसात बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे नदीकाठावरील गावांमध्ये आतापासूनच भीतीचे वातावरण पसरले आहे.