मुंबई : विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. विरोधकांकडून आज कांदा प्रश्नावरून सरकारवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर कांद्याच्या आणि कापसाच्या माळा गळ्यात घालून विरोधकांनी आंदोलन केले. त्यातच अधिवेशन सुरु झाल्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भूजबळ यांनी पडलेल्या कांद्याच्या भावावरुन सरकार शेतकऱ्यांसाठी उपाययोजना करीत नसल्याचा आरोप केला.
दरम्यान, छगन भूजबळांच्या मुद्द्याला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उभे राहिले. हे सरकार शेतकऱ्यांचे सरकार आहे, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करु, असं मुख्यमंत्री म्हणाले. मात्र बोलत असतांना विरोधकांनी एकच गोंधळ सुरु केला. मुख्यमंत्री विरोधकांना बोलू देण्याची विनंती करत होते मात्र मुख्यमंत्र्यांना विरोधी आमदार बोलू देत नव्हते. एवढेच नाही तर अध्यक्षांनी देखील सर्वांना शांत राहण्याचे आवाहन करत होते. मात्र कुणी शांत बसत नव्हतं. शेवटी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्र्यांच्या मदतीला धावून आले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जागेवरून उठून विरोधकांना शांत बसण्याचे आवाहन करत होते, मात्र विरोधक काहीही ऐकून घेण्यास तयार नव्हते. मग फडणवीसांचाही पारा चढल्याचे पाहायला मिळाले.यावेळी त्यांनी “तुम्हाला सरकारच्या कांदा धोरणासंदर्भात माहिती असेल तुम्हीच बोला, आम्ही बसतो.” असे म्हणून त्यांनी संताप व्यक्त केला. त्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना मदतीसंदर्भात आश्वासन दिले आहे.
‘कांदा निर्यातीवर कसलीही बंदी नाही. नाफेडने कांदा खरेदी केली आहे. हे सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांसोबत आहे. शेतकऱ्यांचे नुकसान झालं असेल तर सरकार त्यासंदर्भात मदतीचा निर्णय घेईल’ असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. विरोधकांच्या गदारोळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या मदतीला धावल्याचे पाहायला मिळाले.