जागतिक अन्न व कृषी संशोधन परिषदेच्या निर्देशानुसार 2001 पासून दि. 1 जून हा दिवस “जागतिक दूध दिवस’ म्हणून साजरा केला जातो. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ तयार करणाऱ्या उद्योजकांना प्रोत्साहन देणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. करोनासारख्या जागतिक संकटात आरोग्याशी निगडित अर्थातच प्रतिकारशक्ती वाढविण्याकरिता दूध तसेच दुग्धजन्य पदार्थांची मोठी गरज असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. विशेष म्हणजे जगातील सर्व क्षेत्रांशी संबंधित उद्योगांची पडझड होत असताना अतिशय नाशवंत समजला जाणार दूध व्यवसाय टिकून राहिला.
सर्व क्षेत्रांतील कंपन्यांचे शेअर्स ढासळत असताना दुग्धजन्य ब्रॅंड असलेल्या कंपन्यांच्या शेअर्संना वाढीव भावाची उकळी फुटलेली दिसत होती. खाद्यपदार्थांत आजही सर्वात वरचे स्थान हे दुधालाच असल्याचे या क्षेत्रातील जगभरात होत असलेल्या उलाढालीवरून दिसून येते.
करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आरोग्यासाठी चांगले अन्न, पोषणतत्त्वे आणि यातूनच चांगले आरोग्य अशी संकल्पना निश्चित झाली. जगात होत असलेल्या दूध तसेच दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीवर आपल्या देशाची पडताळणी केली तर दूध उत्पादनात आपला देश जगात आघाडीवर असल्याचे अगोदरच अधोरेखित झाले आहे; परंतु अन्य उत्पादक देशांच्या तुलनेत दुग्ध व्यवसायात आधुनिकता आणण्याची गरज तसेच जागतिक दर्जाचे दुग्धपदार्थ तयार करण्यासाठी आवश्यक असणारे चांगल्या प्रतीच्या दूध उत्पादनाची गरज आजही भासते आहे. दुग्ध व्यवसायात आधुनिक यंत्रांचा वापर केला तर उत्पादन खर्च कमी होतो. या भांडवली खर्चाला 50 टक्क्यांपर्यंत अर्थसाह्य मिळाले तर मोठ्या प्रमाणात परिवर्तन होऊ शकेल.
आपल्या देशातील दूध व्यवसायाचा आता कुठे “रंग’ बदलतो आहे. जागतिक दर्जाची उत्पादने घेत असताना आपल्याकडे “ब्रॅंड’ ही संकल्पना या व्यवसायात गेल्या काही वर्षांत रुजली आहे. त्यामुळेच कधी काळी केवळ “अमुल’ या ब्रॅंडवर अवलंबून असलेल्या बाजारपेठेत आज शेकडो, हजारो ब्रॅंड उपलब्ध झाले आहेत. महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर सोनाई, गोकुळ, गोवर्धन, महानंद, चितळे, गोदावरी, कात्रज, चितळे, नंदिनी, ऊर्जा, गोविंद या सारखे ब्रॅंड बाजारपेठेत अग्रेसर आहेत. तसेच, जिल्हा, तालुका अगदीच काय तर गाव पातळीवरही एखादा छोटा मोठा ब्रॅंड तयार झाला आहे. दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून आता कुठे “श्वेत क्रांती’ झाली आहे.
जगातील ब्रॅंडशी स्पर्धा करायची असेल तर आपल्याला प्रथम दूध स्वीकारण्याच्या पद्धतीमध्ये बदल करणे गरजेचे ठरणार आहे. दूध संकलन त्यातील स्निग्ध पदार्थावर (फॅट व डिग्री) अवलंबून आहे. पण, त्याचबरोबर प्रतिमिली जीवाणूंची संख्या लक्षात घेणे गरजेचे आहे. भारतामध्ये हे प्रमाण 8 ते 10 लाख प्रतिमिली इतके प्रचंड आहे. जोपर्यंत डेअरींकडून अशा पद्धतीचे दूध नाकारले जात नाही तोपर्यंत दर्जेदार दुग्धजन्य उत्पादनाची निर्मिती कठीण ठरणार आहे. दूध गुण प्रत नियंत्रण यंत्रणेचे सक्षमीकरण व आधुनिकीकरण करणे. चारा व खाद्याचे योग्य नियोजन करणे.
आंतरराष्ट्रीय मानांकानुसार दूध व दुधाच्या पदार्थांची निर्मिती करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर संघटितपणे प्रयत्न करणे, याबाबींकडेही लक्ष द्यावे लागणार आहे, अशा पद्धतीने काम झाले तर दूध व दुग्धजन्य पदार्थांची “गॅट’ कराराप्रमाणे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विक्री होऊन त्याचा फायदा उत्पादकांना तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांनाही होईल. दुधाला चांगला हमीभाव देऊन दुधाचे उत्पादन आणि क्षमता वाढविणे, या मुद्द्यांकडेही लक्ष द्यावे लागणार आहे.
संधीचे सोने…
करोना विषाणूमुळे जगात निर्माण झालेली आर्थिक अस्थिरतेची परिस्थिती लक्षात घेतली तरी ती दूध कंपन्यांसाठी फायेदशीर ठरणारी आहे. कारण, या काळात दुग्ध व्यवसाय टिकून आहे. या संधीचे “पांढरे’ सोने करण्याची क्षमता ज्या दुग्ध व्यावसायिक कंपन्यांत असेल तीच दुग्ध कंपनी, तोच ब्रॅंड जागतिक बाजारपेठेत आपले पाय घट्ट रोवू शकेल.
– दशरथ माने, संस्थापक अध्यक्ष, सोनाई उद्योग समूह, इंदापूर