सातारा – महाबळेश्वर येथे बंगला बांधलेल्या गुजरातच्या व्यापाऱ्याला 80 लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी महाबळेश्वर पोलिसांमध्ये तिघांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अल्पेश सागरमल शहा (रा. रामनगर, साबरमती, अहमदाबाद) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. शहा कापड व्यावसायिक असून 2017 मध्ये त्यांनी महाबळेश्वर येथे चार गुंठे क्षेत्रावर बंगल्याचे बांधकाम केले.
दरवर्षी सुट्टीनिमित्त ते येथील बंगल्यावर वास्तव्यास येत असत. शहा यांना “तुमच्या बंगल्याचे बांधकाम बेकायदा आहे, ते पाडून टाकावे लागेल,’ असे सांगून हेमंत साळवी, संजय साळुंखे, इमरान माणकर या तिघांनी 2019 मध्ये त्रास द्यायला सुरवात केली. या तिघांनी शहा यांच्या बंगल्याचे वीज व नळ कनेक्शन तोडून टाकले. साळवीने विशिष्ट मोबाइलवरून बांधकाम पाडण्याची धमकी
देऊन 80 लाख रुपये खंडणीची मागणी केली.
या तिघांनी 4 जानेवारी 2020 रोजी शहा यांच्या बंगल्यात काम करणाऱ्या नोकराच्या फोनवरून जेसीबी आणून बंगल्यांची संरक्षक भिंत पाडण्याची धमकी दिली. पैसे दिले नाही तर ऍट्रॉसिटीची केस टाकण्याची धमकी संजय साळुंखे याने दिली.
पैसे देण्याच्या मागणीला शहा यांनी स्पष्ट नकार देत साळवी, साळुंखे व इमरान माणकर यांच्या विरोधात खंडणी मागितली म्हणून तक्रार दिली आहे. महाबळेश्वर पोलीस अधिक तपास करत आहेत.