पिंपरी – करोनाच्या सावटाखाली संपूर्ण जग आले आहे. भारतातही करोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे शहरापासून तर गावखेड्यापर्यंत सर्वांमध्येच भीतीचे वातावरण आहे. या अभूतपूर्व दहशतीने 40 वर्षांपूर्वीच्या स्कायलॅबची आठवण करून दिली आहे.
स्कायलॅब हा उपग्रह कोसळणार होता. त्यामुळे सर्वांनाच मृत्यूची भीती वाटत होती. अमेरिकेची मानवनिर्मित उपग्रह स्कायलॅब पृथ्वीवर आणि तोही भारतामध्ये कोसळणार त्यातील रसायनाचा स्फोट होऊन निघणाऱ्या विषारी धुराने अनेक शहरे व गावांमधील नागरिक मृत्युमुखी पडणार अशी भीती त्या वेळी पसरली होती.
1978-79 च्या काळात आजच्यासारखा इलेक्ट्रॉनिक किंवा सोशल मीडिया नसतानाही ती बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. त्यामुळे प्रत्येकाच्या मनात मृत्यूची भीती होती. काटकसरीने जीवन जगणाऱ्या नागरिकांनीही हात मोकळे करत खर्च करायाला या काळात सुरुवात केली होती. आता मरण येणारच आहे तर पैसे ठेवून काय करायचे अशी त्यांची भूमिका होती. विविध ठिकाणी पूजाअर्चा केल्या जात होत्या. अनेकजण आपल्या इच्छा पूर्ण करून जीवनाचा आनंद घेत होते. कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येत होते. तर काही ठिकाणी मृत्यूच्या भीतीने शांतता पसरली होती.
विषारी वायू आणि स्फोटातून जिवंत राहता यावे म्हणून काहींनी जमिनीत भुयार केले होते. संपूर्ण देशामध्ये हायअलर्ट लागू करण्यात आला होता. जागोजागी पोलीस व सैन्याचे ताफे दिसत होते. मात्र अथक परिश्रम घेऊन त्यावेळच्या शास्त्रज्ञांनी तो स्कायलॅब हिंदी महासागरात पाडला आणि भारतवासीयांचे संकट टळले.
कसा होता स्कायलॅब
स्कायलॅब हा उपग्रह अमेरिकेने 14 मे 1973 रोजी अंतराळात सोडला होता. सतत पाच वर्ष व्यवस्थित काम केल्यावर नासाच्या अहवालानुसार 1978-79 मध्ये अंतराळात सौरऊर्जेचे भयंकर वादळ उठले होते. त्यात स्कायलॅबचे संपूर्ण पॅनल जळून खाक झाले. हळूहळू त्यातील इंजिनाने काम करणे बंद केले. त्यामुळे तो पृथ्वीकडे सरकत होता. हा स्कायलॅब भारतावरच पडू शकतो असा अंदाज शास्त्रज्ञांनी केला. हा स्कायलॅब एका मोठ्या इमारतीएवढा व त्याचे वजन साडे सात क्विंटल असल्याची नोंद आहे.