हिंगोली ( शिवशंकर निरगुडे) : हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात सततच्या पावसाने सोयाबीन सह विविध पिकांचे नुकसान केल्यानंतर आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. तुर या पिकावर नवे संकट आले असून मर रोगाने तुरीचे पिक वाळून जात असल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे.
सेनगाव तालुक्यात साखरा हिवरखेडा घोरदरी ,धोतरा खडकी ,बोरखेडी, हत्ता कापडशिंगि, उटी ब्रम्हचारी या सह तालुक्यातील अनेक गावात पावसाने विविध पिकांचे नुकसानकेले होते. मात्र तूर या पिकाकडून अपेक्षा असणाऱ्या शेतकऱ्यांच्या सर्व अपॆक्षा पुन्हा मातीमध्ये मिसळत असल्याचे दिसत आहे. मर रोगाने तुरीचे पिक वाळून जात असल्याने शेतकरी चिंतेत असल्याचे चित्र आहे.
तूर उधळणे म्हणजे तुरीचे पिक बुडापासून वाळणे होय. यालाच मर रोगाचा प्रादुर्भाव म्हणतात, असे तालुका कृषी अधिकारी संदीप वळकुंडे यांनी सांगितले आहे. तालुक्यात अनेक गावांत अचानक बहरात आलेली तूर मोठ्या प्रमाणावर वाळत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा येथील शेतकरी दत्तराव निरगुडे यांच्या शेतातील 2 एकर मधील तूर पिक वाळत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
ऐन बहरातील पिकावर हे नवे संकट उभारले आहे. यावर सध्या तरी कोणता उपाय नसून पिक पद्धतीत पुढील वर्षी बदल करावा लागणार असून मागे पडलेल्या जास्तीच्या पावसाने वावरात पाणी साचून ते त्यात मुरले व बुरशी वाढून आता त्याचा हा परिणाम होत असल्याचे तालुका कृषी अधिकारी संदीप वळकुंडे यांनी सांगितले.
सेनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले होते प्रशासनाच्या वतीने पंचनामे करून शेतकऱ्याना मदत करण्यात आली होती मात्र पिक विमा कंपनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. आता तूर पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे प्रशासनाच्या वतीने तुरीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी इथल्या शेतकऱ्यांनी केली आहे.