गुजरातमध्ये भाजप विरुद्ध आप यांच्यात चकमकी आणखी वाढत जाणार असून, त्याची पूर्वचिन्हे आतापासूनच बघायला मिळत आहेत.
गुजरातमध्ये नजीकच्या भविष्यात विधानसभा निवडणुका होणार असून, हिमाचल प्रदेशच्या निवडणुका होत असतानाच त्या व्हाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु त्या हिमाचलबरोबर होणार नसल्या, तरीही लवकरच होणार असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुजरात दौरे वाढले असून, हजारो कोटी रुपये प्रकल्पांच्या घोषणा केल्या जात आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही गुजरातचा दौरा करून विरोधी पक्षांवर चांगलेच तोंडसुख घेतले. गुजरातेत कॉंग्रेस हा प्रमुख विरोधी पक्ष असला, तरी सुरत महानगरपालिकेत घवघवीत यश मिळाल्यामुळे आम आदमी पक्षाला (आप) तेथे आशा निर्माण झाल्या आहेत.
गुजरातमध्ये कुठल्याही परिस्थितीत निदान कॉंग्रेसपेक्षा अधिक यश मिळवण्याचा चंग आपने बांधला असून, त्यामुळे भाजपने आपले चौकशांचे ब्रह्मास्त्र बाहेर काढले आहे. म्हणूनच नवी दिल्लीचे आपचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना तपास यंत्रणांनी लक्ष्य केले. नुकतेच आपच्या लोकप्रतिनिधींच्या पहिल्या राष्ट्रीय संमेलनास संबोधित करताना, आपचे राष्ट्रीय निमंत्रक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, “गुजरातमधील आपच्या वाढत्या प्रभावामुळे भाजप विचलित झाला आहे. टीव्ही चॅनेल्सच्या मालक व संपादकांना पंतप्रधानांचे सल्लागार हिरेन जोशी हे फोन करून, आपच्या बातम्यांना स्थान देऊ नका, अन्यथा गंभीर परिणाम होतील, अशा धमक्या देत आहेत. या धमकीवजा संदेशांचे स्क्रिनशॉट प्रसृत केले, तर पंतप्रधान आणि त्यांचे सल्लागार देशाला तोंड दाखवू शकणार नाहीत.’
आप सरकार देत असलेल्या वीज व पाणीपट्टीतील सवलतींची टिंगल पंतप्रधानांनी “रेवडी संस्कृती’ या शब्दात केली होती. त्यावरूनही केजरीवाल यांनी मोदी यांना प्रत्युत्तर दिले होते. आता आपचे गुजरातमधील प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया यांनी मोदींवर टीका करताना अभद्र टिप्पणी केल्याचा आरोप आहे. दिल्ली पोलिसांनी त्यांना गेल्या आठवड्यात स्थानबद्धही केले होते. राष्ट्रीय महिला आयोगाने त्यांना नोटीस पाठवली होती, तेव्हा इटालिया हे शे-दीडशे समर्थक घेऊन आयोगाच्या नवी दिल्लीतील कार्यालयात पोहोचले. इटालिया यांची मूळ टिप्पणी, तसेच त्यांनी समर्थक घेऊन आयोगावर दडपण आणण्याचा प्रयत्न करणे, याविरोधात आयोगाच्या प्रमुख रेखा शर्मा यांनी नाराजी व्यक्त केली होती. उलट, रेखा शर्मा यांनी आपल्याला तुरुंगात डांबण्याची धमकी दिल्याचा इटालिया यांचा आरोप आहे. वास्तविक मोदी यांच्या कुटुंबातील व्यक्तींबद्दल चुकीची भाषा वापरणे, हे धिक्कारार्ह असून, त्याबद्दल इटालिया यांच्यावर कारवाई केली गेलीच पाहिजे.
एरवी देशातील भ्रष्टाचार, नैतिकता, अनाचार, याबद्दल प्रवचने देणाऱ्या केजरीवाल यांनी इटालिया यांना जाहीर माफी मागण्यास सांगितले पाहिजे. अन्यथा त्यांना पक्षातून काढूनही टाकले पाहिजे. मात्र, मी पटेल असल्यामुळे तसेच आपच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे मला लक्ष्य करण्यात येत आहे, असे इटालिया यांनी म्हटले आहे. हा युक्तिवाद भंपकपणाचा आहे. एखादा पक्ष फैलावत असेल म्हणून काही त्याच्या नेत्यांना वाट्टेल ते बोलण्याचा परवाना देण्यात आलेला नसतो. शिवाय इटालिया हे दोन वर्षांपूर्वीच आपमध्ये गेले असून, उमेदवारांची निवड, निधी उभारणी, संघटनेचा विस्तार आदी जबाबदाऱ्या त्यांच्यावर टाकण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षी चंदीगड महापालिकेच्या निकालांमध्ये आप हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. या महापालिकेत एकूण 35 जागा होत्या आणि त्यातील सर्वाधिक, म्हणजे 14 जागा आपला मिळाल्या. भाजपला 12, कॉंग्रेसला 8 आणि अकाली दलाला एका जागेवर विजय मिळाला. 2020 साली दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपने 70 पैकी 62 जागा मिळवल्या. त्या अगोदरच्या विधानसभा निवडणुकीत आपला 67 जागा मिळाल्या होत्या.
प्रचाराच्या काळात पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हनुमान मंदिराला भेट दिली आणि हनुमान चालिसाचे पठण केले. शाहीनबागमध्ये नागरिकता दुरुस्ती विधेयकाविरुद्ध आंदोलन सुरू असताना, तेथे न जाण्याची चतुराई केजरीवाल यांनी दाखवली. आपण रामभक्त, हनुमानभक्त तसेच हिंदू धर्माचे उपासक आहोत हे सातत्याने दाखवून, भाजपला अपप्रचार करण्याची कोणतीही संधी ते मिळू देत नाहीत. त्याचप्रमाणे नवी दिल्लीत आरोग्य व शिक्षण क्षेत्रात आपने चांगली कामे केली असून, त्यामुळे पक्षाच्या कारभाराचे नाणे खणखणीतपणे वाजत आहे. जनतेला अनेक नागरी सुविधा स्वस्तात अथवा सवलतीच्या दरात देऊ, आपने आपली एक लोकाभिमुख प्रतिमा निर्माण केली आहे. पंजाबात सत्ता मिळवल्यानंतर तर या पक्षाच्या आत्मविश्वासात इतकी वाढ झाली आहे की, आपने चक्क महाराष्ट्रातील रत्नागिरीतही प्रवेश केला आहे. “आपली रत्नागिरी, स्वच्छ रत्नागिरी, भ्रष्टाचारमुक्त रत्नागिरी’ अशा मजकुराचे होर्डिंग रत्नागिरीत झळकले होते. असो.
तर सध्या चर्चेत असलेल्या गोपाल इटालिया यांनी 2013 साली गुजरात पोलिसांच्या लोकरक्षक दलात कॉन्स्टेबलची नोकरी पत्करली होती. पुढच्याच वर्षी त्यांनी महसूल विभागात कारकुनी करण्यास सुरुवात केली. 2015 मध्ये हार्दिक पटेल यांच्या नेतृत्वाखाली पाटीदारांना आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू झाले त्यात इटालिया यांनी भाग घेतला. त्यावेळी इटालिया हे हार्दिक यांचे निकटवर्तीय बनले होते. 2017 मध्ये त्यांना नोकरीतून बडतर्फ करण्यात आले. मात्र पाटीदार आंदोलनातील इटालियांचे नेतृत्वगुण पाहून केजरीवाल प्रभावित झाले होते. चार वर्षांपूर्वी इटालिया यांनी संविधानाबद्दल जनतेचे प्रबोधन करण्यासाठी “कायदाकथा’ नावाचा स्तुत्य उपक्रम सुरू केला व तो लोकप्रिय झाला. आपमध्ये प्रवेश केल्यानंतर इटालिया यांनी सुरत महापालिकेत आपला 27 जागा मिळवून दिल्या. भरती घोटाळ्याविरुद्ध त्यांनी आंदोलन सुरू केले आणि गुजरात सब ऑर्डिनेट सिलेक्शन बोर्डाचे अध्यक्ष व अहमदाबादेतील भाजपचे बडे नेते असित व्होरा यांच्या हकालपट्टीची मागणी केली. या आंदोलनामुळे इटालिया यांना दहा दिवसांचा तुरुंगवासही सहन करावा लागला. एकूण, येते काही महिने गुजरातमध्ये भाजप विरुद्ध आप यांच्या चकमकी आणखीच वाढत जाणार असून, त्याची पूर्वचिन्हे आतापासूनच बघायला मिळत आहेत.