भारतीय मनोरंजन सृष्टीतील एंटरटेनमेंट क्वीन म्हणून ओळखली जाणारी निर्माती एकता कपूरचे कान टोचण्याचे काम सर्वोच्च न्यायालयाने केल्यामुळे मनोरंजनाच्या नावाखाली लोकांच्या माथी काहीही मारणाऱ्या सर्वच निर्माते आणि दिग्दर्शकांचे डोळे उघडतील, अशी आशा करायला हवी.
एकता कपूरच्या मालकीच्या एका ओटीटी प्लॅटफॉर्मवर पूर्वी प्रसारित झालेल्या एका वेब सीरिजच्या निमित्ताने तिच्या विरोधात जो गुन्हा दाखल झाला आहे त्यासंदर्भात सुनावणी सुरू असताना सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत स्पष्ट शब्दांमध्ये “एकता कपूर ही आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांची माथी प्रदूषित करत असून निर्माते आणि दिग्दर्शक प्रेक्षकांसमोर कोणते पर्याय उपलब्ध करत आहेत, त्याचा विचार करायची गरज आहे’, असे म्हटले आहे.
हा विषय एकता कपूरच्या एका मालिकेपुरता मर्यादित असला, तरी एकता कपूरच्याच विचारसरणीने मनोरंजनाचे प्रदूषित उत्पादन करणाऱ्या सर्वच निर्माते आणि दिग्दर्शकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या या ताशेऱ्यांचा गांभीर्याने विचार करायला हवा. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली काहीही आणि कसेही दाखवण्याचे स्वातंत्र्य आपल्याला आहे, असाच समज या मनोरंजन क्षेत्रातील मंडळींनी करून घेतला असेल, तर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना त्यांची योग्य जागा दाखवून दिली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मची लोकप्रियता भारतात वाढल्यानंतर आणि या प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणाऱ्या मनोरंजनासाठी कोणत्याही प्रकारची सेन्सॉरशीप उपलब्ध नसल्याने निर्माते आणि दिग्दर्शकांनी ताळतंत्र सोडून कार्यक्रम निर्मिती केली आहे. एकता कपूरच्या ज्या मालिकेचा विषय सर्वोच्च न्यायालयासमोर आला होता त्या मालिकेमध्ये भारतीय लष्कराच्या जवानाबाबत आणि त्यांच्या कुटुंबाबाबत अतिशय चुकीच्या पद्धतीने भाष्य करण्यात आले होते आणि काही प्रसंगही अतिशय विकृत पद्धतीने दाखवण्यात आले होते. म्हणून एका माजी लष्करी अधिकाऱ्यांनी या मालिकेच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली होती. प्रत्येक सुनावणीच्या वेळी गैरहजर राहून आपल्या वकिलांच्या माध्यमातून युक्तिवाद करणाऱ्या एकता कपूरला यावेळी मात्र सर्वोच्च न्यायालयाने तिची जागा दाखवून दिली.
तुम्हाला महागडे वकील घेणे परवडते म्हणून कोणत्याही प्रकारचे हीन दर्जाचे मनोरंजन लोकांच्या माथी मारता का, अशाप्रकारचा सवाल सर्वोच्च न्यायालयाने एकता कपूरला विचारला आहे. या प्रश्नाचे उत्तर फक्त एकता कपूरच नव्हे तर ओटीटी प्लॅटफॉर्मवर गलिच्छ, विकृत आणि लैंगिक दृश्यांचा भडीमार करणारे कार्यक्रम निर्माण करणाऱ्या सर्वच निर्माता-दिग्दर्शकांनी या प्रश्नाचे उत्तर देण्याची गरज आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कार्यक्रम आणि वेब सीरिज लैंगिक दृश्ये, हिंसाचार आणि गलिच्छ भाषा याशिवाय पूर्णच होऊ शकत नाहीत, असा गैरसमज अनेक निर्माता, दिग्दर्शकांचा असल्याने अशाच मालिकांचा आणि कार्यक्रमांचा भडीमार सध्या सर्व ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुरू आहे. या ठिकाणी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांना आणि मालिकांना कोणत्याही प्रकारची सेन्सॉरशिप लागू नसल्याने आपण करू तेच बरोबर अशा भूमिकेतून हे निर्माते-दिग्दर्शक प्रेक्षकांच्या माथी काहीही मारायला लागले आहेत. निर्माते आणि दिग्दर्शकाने तारतम्य वापरून या प्लॅटफॉर्मचा वापर करावा, असे अपेक्षित असले तरी प्रेक्षक संख्या वाढवण्यासाठी निर्माता-दिग्दर्शकांनी लैंगिक दृश्य आणि हिंसाचार या दोन गोष्टींना प्राधान्य दिले आहे. अनेक वेळा अतिशय आक्षेपार्ह संवादही या मालिकांच्या निमित्ताने समोर येत असतात.
निर्माते आणि दिग्दर्शक आपली राजकीय व सांस्कृतिक भूमिका समोर आणण्यासाठीसुद्धा आता ओटीटी प्लॅटफॉर्मचा वापर करू लागले आहेत, हेच गेल्या काही कालावधीमध्ये सिद्ध झाले आहे. एकता कपूरचा विचार करायचा झाल्यास तिने नेहमीच वादग्रस्त कन्टेंट देण्याचा प्रयत्न केला आहे. तिच्या सर्वच मालिका अशा प्रकारे लैंगिक दृश्यांनी भरगच्च असलेल्या आणि हिंसाचाराला प्राधान्य देणाऱ्या आहेत. खरेतर एकता कपूरच्या ज्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हे सर्व कार्यक्रम दाखवले जातात तो प्लॅटफॉर्म चोखंदळ प्रेक्षकांच्या यादीमध्ये वरच्या क्रमांकावर नाहीच. उलट अनेक चोखंदळ प्रेक्षक या ओटीटी प्लॅटफॉर्म पासून दूरच आहेत. केवळ एकता कपूरच नव्हे तर आज भारतामध्ये असे अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म आहेत ज्यामध्ये सॉफ्ट पॉर्न प्रकारातली वेबसीरिज दाखवण्यास प्राधान्य दिले जाते. लोकांना असे कार्यक्रम आवडतात म्हणून आम्ही ते प्रसारित करतो अशी जर भूमिका या निर्माता-दिग्दर्शकांनी घेतली असेल तर ती निश्चितच चुकीची आहे.
कारण सुमारे दहा वर्षांच्या कालावधीत भारतात ओटीटी प्लॅटफॉर्म लोकप्रिय झाल्यानंतर ज्या सर्वात लोकप्रिय वेबसीरिज आहेत आणि टीआरपी मध्ये ज्या मालिका आघाडीवर आहेत त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचा अतिरेकी लैंगिक मालमसाला नव्हता किंवा हिंसाचारही नव्हता. पूर्ण कुटुंब बघू शकेल अशाच मालिकांनी आतापर्यंत टीआरपीमध्ये आघाडी घेतली आहे, हे वास्तव एकता कपूर आणि तिच्या विचारसरणीच्या सर्वच निर्माता-दिग्दर्शकांनी लक्षात घ्यायला हवे. सर्वोच्च न्यायालयाने एकता कपूरचे कान टोचताना वापरलेल्या शब्दांप्रमाणे जर अशा प्रकारच्या कार्यक्रमांमुळे प्रेक्षकांचे मेंदू प्रदूषित करण्याचे काम होत असेल तर आता असे सांस्कृतिक प्रदूषण करून सामाजिक वातावरण बिघडवण्याचे काम करणाऱ्या निर्मात्या आणि दिग्दर्शकांवर नियंत्रण ठेवण्याची वेळ आली आहे, असे वाटते.
वेब सीरिजच्या प्रत्येक भागामध्ये ठराविक अंतराने येणारी लैंगिक दृश्य, अंगावर येणारा हिंसाचार आणि गलिच्छ संवाद हा जर वेब सीरिज यशस्वी होण्याचा मंत्र आहे, असे या निर्माता, दिग्दर्शकांना वाटत असेल तर त्यांचा हा गैरसमज दूर करण्याचे काम इतर काही प्रतिभाशाली दिग्दर्शकांनी करायला हवे. महत्त्वाचं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या या ताशेऱ्यांचा आधार घेऊन देशाच्या मनोरंजन खात्यानेसुद्धा ओटीटी प्लॅटफॉर्मसुद्धा सेन्सॉरशिप खाली कशा प्रकारे आणता येईल याचा आता गांभीर्याने विचार करायची वेळ आली आहे. मनोरंजन क्षेत्रातील या हानिकारक प्रथेवर नियंत्रण ठेवण्यासाठी आता सर्वच पातळीवर एकाच वेळी प्रयत्न करण्याची गरज आहे, हे निश्चित.