आंबेगाव तालुक्यात लाखो रुपये खर्चून उभारलेले घाट दयनीय अवस्थेत
पेठ – ग्रामीण भागात बैलगाडा शर्यत हा प्रतिष्ठेचा आणि रोमहर्षक खेळ मानला जात असल्याने त्याचे मोठे आकर्षण आहे. या शर्यतींत लाखोंच्या पैजाही लावल्या जातात. आकर्षक बक्षिसे दिली जातात. बैलगाडा शेतकऱ्यांसाठी अस्मितेचा विषय आहे. मात्र, गेल्या सहा वर्षांपासून बैलगाडा शर्यत बंद आहे. अशा परिस्थितीतही बैलगाडा मालक आपल्या बैलांचा मुलांप्रमाणे सांभाळ करीत आहेत; पण या शर्यती बंद असल्याने अनेक गावांत बैलगाडा पळविण्यासाठी उभारलेले बैलगाडा घाटांना अवकळा प्राप्त झाली आहे. लाखो रुपये खर्च करून उभारलेले घाट
आज दयनीय अवस्थेत आहे.
सध्याच्या तांत्रिक युगात शेतीकामात बैलांचा वापर कमी झाला आहे. न्यायालयाच्या बंदीमुळे शेतकऱ्यांच्या आवडत्या बैलगाडा शर्यती गेल्या काही वर्षांपासून बंद आहेत. मात्र, भविष्यात ही बंदी उठून पुन्हा बैलगाडा शर्यती सुरू होतील, अशा आशेवर शेतकरी आहेत, त्यामुळे बैलांची आवड व जिव्हाळा असलेले अनेक शेतकरी बैलांना वाऱ्यावर न सोडता चांगल्याप्रकारे सांभाळत आहेत. या बैलांना भार न समजता त्यांच्या पालनपोषणासाठी खर्च करीत आहेत.
बैलगाडा शर्यतीसाठी लागणारे खिलारी बैलांची पैदास ही दुष्काळग्रस्त क्षेत्रात होते. हे बैल पश्चिम महाराष्ट्रात विकले जातात. यामध्ये गावरान गायीचा गोवंश टिकवून ठेवण्यासाठी मदत होते, त्यामुळे बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून राष्ट्रीय नाही तर आंतरराष्ट्रीय पर्यटकांनाही या ग्रामीण भागाकडे आकर्षित करता येणार आहे.
बैलगाडा शर्यतीबाबत राजकारण नको
बैलगाडा शर्यती हा शेतकऱ्यांचा आवडीचा खेळ असून शेतकरी मुलांप्रमाणे बैलांवर प्रेम करतात. बैलांच्या दशक्रिया घालणारे अनेक शेतकरी आहेत. देशी गाईंचा वंश टिकवून ठेवण्यासाठी खिलारी जातीच्या बैलांचा वापर होतो. ग्रामीण भागातील अर्थकारणही त्यावर अवलंबून असते. निवडणूक जवळ आली की बैलगाडा शर्यतीवर राजकारण चालू होते.सर्व पक्षीयानी एकत्रितपणे हा प्रश्न सोडवावा, अशी मागणी आंबेगाव उपतालुका प्रमुख दिलीपराव पवळे, मल्हारी अण्णा ढमाले, के. के. थोरात, संपतराव शिंदे, कवी ज्ञानेश्वर धुमाळ आदी प्रसिद्ध बैलगाडा मालकांनी केली आहे.
देशातील बैलांच्या विविध स्पर्धा
भारतामध्ये सगळ्या सांस्कृतिक आणि पारंपरिक यात्रा, जत्रा, सणाच्या निमित्तानं बैलगाड्यांच्या शर्यती होतात. तामिळनाडूमध्ये रेकला नावाने शर्यत आणि जल्लीकट्टू स्पर्धा होतात. (जल्लीकट्टूचा अर्थ पैशांची थैली. बैलाच्या शिंगाला पैसे किंवा सोन्याची पुरचुंडी बांधायची आणि स्पर्धकाने बैलाच्या वशिंडाला धरून ती मिळवायची, असा हा पुरातन खेळ) आपल्याकडे बैल गाडी, गाडा, खटारा, छकडी अशा शर्यती होतात. कोकणामध्ये किनाऱ्यावर छकडी, पश्चिम-दक्षिण महाराष्ट्रात अरात-परात. पश्चिम महाराष्ट्रात बैलगाडे घाटातून पळवतात तर विदर्भात शंकरपट नावाने माळरानावर खेळ होतो.