नवी दिल्ली -: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत २०२१ – २०२२ साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला आहे. कोरोनाच्या महामारीमुळे अडचणीत सापडलेल्या आपल्या देशाची पुढील दिशा काय असणार हे आजच्या अर्थसंकल्पात पाहायला मिळाले. अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या बजेटवर आता प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.
अर्थसंकल्पावर विविध स्तरातून संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. तर दुसरीकडे काही विरोधकांनी मात्र यावर टीका केली आहे. केंद्राच्या या अर्थसंकल्पावर सीपीएमनं हल्लाबोल केला. या अर्थसंकल्पात रेल्वे, बँक, विमा, संरक्षण आणि स्टील या सर्वांची विक्री करण्याच्या तयारीत सरकार आहे. हा अर्थसंकल्प आहे की OLX असा सवाल सीपीएमचे नेते सलीम अली यांनी केला.
या व्यतिरिक्त अर्थसंकल्पावर टीएमसी नेते डेरेक ओ ब्रायन यांनीदेखील कडाडून टीका केली आहे. “हा भारताचा पहिला पेपरलेस १०० टक्के दृष्टीहीन अर्थसंकल्प आहे. यांची थीम देश विका ही आहे. रेल्वे विकली जात आहे, विमानतळं विकण्याची तयारी आहे, बंदरे विकली जात आहेत, विमा क्षेत्र विकलं जात आहे, २३ पीएसयू विकल्या जात आहेत. सरकारनं सामान्य लोकांकडे दुर्लक्ष केलं, शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केलं. श्रीमंत हे अधिक श्रीमंत होत आहेत आणि मध्यम वर्गीयांसाठी काहीच नाही, गरीब अजून गरीब होत आहेत,” अशी खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी केली.