राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते रोहित पवार यांची टीका
पुणे : भाजपच्या नेत्यांमध्ये हिम्मत नसल्यामुळेच ते शरद पवारांनी घडवलेले नेते आयात करत आहेत,अशी गंभीर टीका राष्ट्रवादीचे नेते आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी भाजपवर केली आहे. भाजपकडे नेते नाहीत. त्यामुळे आमच्याकडून गेलेले नेते त्यांच्या डब्यात पाणी भरत आहेत. याचा अर्थ कार्यकर्ते आणि नेते घडविण्यात भाजप कमी पडत आहे, असा टोला रोहित पवार यांनी लगावला.
गेल्या काही दिवसांत बड्या नेत्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे. यामध्ये उदयनराजे भोसले, राणा जगजितसिंह पाटील, सचिन अहिर, वैभव पिचड, मधुकर पिचड, चित्रा वाघ, शिवेंद्रराजे भोसले यांचा समावेश आहे. त्यावरच प्रतिक्रिया देत असताना रोहित पवार यांनी भाजपवर टीका केली. बारामतीमध्ये महाजनादेश यात्रेच्यावेळी झालेली घोषणाबाजी ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची स्वाभाविक प्रतिक्रिया होती अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली. महाजनादेश यात्रा बारामतीमध्ये असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर ‘एकच वादा, अजित दादा’ अशी घोषणा दिल्या होत्या.