मुंबई : नवनीत राणा आणि रवी राणा यांना शनिवारी रात्री खार पोलीस स्टेशनमध्ये भेटायला गेलेल्या भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर जमावाने दगडफेक केली. या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. किरीट सोमय्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली होती. त्यातच आज सकाळी किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषदेत घेत सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
खार पोलीस स्थानकाबाहेर आपल्यावर झालेला हल्ला हा उद्धव ठाकरे सरकारने स्पॉन्सर केलेला होता, अस गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी यावेळी म्हणाले आहेत. “काल खार पोलीस स्टेशनबाहेर माझ्यावर जो हल्ला झाला, तो ठाकरे सरकारने स्पॉन्सर्ड केलेला हल्ला होता. मी पोहोचण्याआधीच संध्याकाळी पोलिसांना कळवलं होतं की रात्री मी येणार आहे. पण मी पोहोचण्याआधीच ७०-८० शिवसेना कार्यकर्ते पोलीस स्टेशनच्या आवारात, दाराजवळ जमले होते”, असा दावा किरीट सोमय्यांनी केला.
दरम्यान, पोलीस स्थानकातून बाहेर पडताना आपल्यावर हल्ला होणार असल्याचे पोलिसांना आधीच सांगितले होते, असा दावा देखील किरीट सोमय्या यांनी केला. “पोलीस स्थानकात येताना मला शिवीगाळ झाली, गाडी थांबवण्याचा प्रयत्न झाला. परत जाताना मी पोलिसांना सांगितलं की हल्ला होणार आहे. पोलिसांनी व्यक्तिगत जबाबदारी केली की आम्ही आहोत. आम्ही व्यवस्था केली आहे. पण गेट उघडताच ७०-८० गुंडांच्या हवाली माझ्या गाड्या करण्याचं पाप उद्धव ठाकरेंच्या पोलिसांनी केलं. या सगळ्यासाठी पोलीस आयुक्त संजय पांडे जबाबदार आहेत”, असं सोमय्या म्हणाले. या दरम्यानच्या काळात मुख्यमंत्री कार्यालय आणि पोलीस आयुक्त संजय पांडे सातत्याने संपर्कात होते, असा दावा देखील त्यांनी केला.
दरम्यान, पोलिसांनी आपल्याला धमकी दिल्याचा आरोप सोमय्यांनी केला. “एफआयआरमध्ये लिहिलंय की शिवसेना कार्यकर्ते ३ किलोमीटर दूर आहेत. हे पोलीस आयुक्त संजय पांडेंनी लिहून दिलं. माझ्या गाडीवर फक्त एकच दगड आला हे माझ्या नावाने संजय पांडेंनी लिहिलं. ज्या वेळी माझी सही घ्यायला ते आले, मी सांगितलं की मी या मॅनिप्युलेटेड एफआयआरवर सही करणार नाही. तर मला तिथले डीसीपी धमकी देतात की एफआयआर नोंद झाली आहे. तुम्ही सही केली नाही तरी हीच एफआयआर गृहीत धरली जाणार. या प्रकारची गुंडगिरी हे माफिया सरकार करतंय”, असे ते म्हणाले.