पुणे – भाजप शहर कार्यकारिणी तसेच पक्षाच्या संलग्न संघटनेतील काही पदाधिकाऱ्यांनी कसबा निवडणूक सोपी असल्याने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा वरदहस्त मिळवत या निवडणुकीच्या जबाबदाऱ्या पदरात पाडून घेतल्या. प्रत्यक्षात मतदारसंघात काय स्थिती आहे, याचा विचार न करताच उमेदवार अडचणीत असतानाही चंद्रकांत पाटील यांना अंधारात ठेवले. परिणामी, या ठराविक पदाधिकाऱ्यांवर पालकमंत्री पाटील यांनी विश्वास ठेवल्याने पक्षावर ही वेळ ओढावल्याची चर्चा भाजपचे शहर पदाधिकारी खासगीत करू लागले आहेत.
तब्बल 28 वर्षे भाजपच्या ताब्यात असलेल्या कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपला पराभवाचा धक्का बसल्याने आता पक्षात आरोप- प्रत्यारोप सुरू झाले आहेत. हे प्रकार थांबले नाहीत, तसेच कार्यकर्त्यांना योग्य वागणूक आणि कार्यक्षमता लक्षात घेऊन जबाबदाऱ्या दिल्या न गेल्यास महापालिका निवडणूक भाजपला आणखी अवघड जाईल असे पक्षाचे पदाधिकारीच खासगीत सांगत आहेत. त्यामुळे कसब्याच्या पराभवाचा राज्याच्या सत्ताकारणावर परिणाम होणार नसला, तरी शहर भाजपमध्ये मात्र या पराभवाने अस्वस्थता पसरली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर या पराभवाचे खापर अप्रत्यक्षरित्या फोडले जात आहे.
कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांची निवडणूक लोकांनी हाती घेतली, त्याच प्रकारे खासदार बापट यांचेही मतदारसंघात वजन राहिले आहे. प्रत्येक घर, प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकाऱ्याला ते ओळखत होते. त्यामुळे मतदारसंघ 28 वर्षे ताब्यात ठेवण्यात ते यशस्वी झाले. मात्र, पोटनिवडणुकीत याच कार्यकर्त्यांना खड्यासारखे बाजूला करत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकांचा अनुभव नसलेली तसेच जिंकल्यास आपले नाव होऊन पक्षाकडून मोठी संधी मिळेल हे लक्षात घेऊन पाटील यांच्याजवळील काहींनी फिल्डिंग लावली. तर, चंद्रकांत पाटील यांनीही कोणताही मागचा पुढचा विचार न करता कसब्यातील निष्ठावान तसेच जाणकार माजी नगरसेवक, ज्येष्ठ कार्यकर्ते बाजूला करत कसब्या बाहेरील कार्यकर्त्यांची फळी मैदानात उतरविली. त्यामुळे अनेकांनी प्रचारातून अंग काढून घेतले. तर अनेकांनी शांत राहत जे घडतंय ते पाहण्याची भूमिका घेतली. त्याचा परिपाक म्हणून “आम्हाला कसबा गमवावा लागला’ असे पदाधिकारी सांगत आहेत.
“आता तरी शहाणे व्हावे’
पुण्यातील राजकीय स्थिती वेगळी आहे. पुण्यात स्थानिक प्रश्नांना महत्व असून, प्रत्यक्षात मतदारसंघातील सद्यस्थिती वेगळी असते. त्यामुळे कसबा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा धडा घेऊन पक्षाने तसेच नेत्यांनी कार्यपद्धतीत बदल करावा. निष्ठावान कार्यकर्त्यांना तोडू नये अशी भावना व्यक्त केली जात आहे. कसबा निवडणुकीचे पडसाद शहरात आगामी लोकसभा तसेच महापालिका निवडणुकीवर पडण्याची शक्यता असल्याने पाटील यांनी आतापासूनच आसपासच्या सल्लागारांना बाजूला करून प्रत्यक्षात काय स्थिती आहे, हे जाणूनच निर्णय घ्यावेत अशी अपेक्षा पदाधिकारी व्यक्त करत आहेत.