सोरतापवाडी – विधानसभेच्या पोटनिवडणूकी नंतर आता पुणे जिल्ह्याचे लक्ष पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीकडे लागले आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर हे निवडून आले असुन ते एक सामान्य माणूस म्हणून सर्वांना परिचित आहेत. तशाच प्रकारे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य तरुणांना संधी द्यावी, अशी मागणी लवकरच विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे करण्यात येणार असल्याचे पेठ गावचे माजी सरपंच सूरज चौधरी यांनी सांगितले.
आशिया खंडात नंबर एकवर असलेली व 19 वर्षे निवडणुकीपासून दूर असलेली पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक घोषित झाली आहे. आत्ताच झालेल्या दोन पोटनिवडणुकीमुळे या निवडणुकीकडे थोडेसे दुर्लक्ष झाले होते. महाविकास आघाडीचा एक व भाजपचा एक उमेदवार विजयी झाल्याने बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये हवेली तालुक्यातील सर्व पक्षातील भावी उमेदवारांमध्ये नवचैतन्य आले आहे.
हवेली तालुक्यातील दिग्गज नेत्यांनी बाजार समितीच्या निवडणुकीची तयारी केली आहे. या निवडणुकीमध्ये करोडो रुपये खर्च करण्याची तयारी उमेदवारांकडून होणार असल्याची चर्चा हवेली तालुक्यात नागरिकांच्या मध्ये जोरात चालू आहे. आगामी निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांची जाण असणाऱ्या उमेदवारास प्रतिनिधित्व मिळावे. वाढत्या महागाई मुळे शेतकरी हवालदिल झाला असून बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करण्यात येण्यासाठी, तसेच वेगवेगळ्या योजना आखून, शेतमालास भाव मिळण्यासाठी, योग्य प्रकारे मालाचे नियोजन करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याऱ्या युवकांना संधी मिळावी.
-मारुती बरकडे, माजी सरपंच तरडे
स्व.अशोकभाऊ काळभोर यांनी बाजार समितीवर अनेक सामान्य युवकांना कार्य करण्यासाठी संधी दिली. तशीच संधी आत्ता पण सामान्य लोकांना मिळावी हीच खरी अशोक भाऊंना श्रद्धांजली ठरेल. धनशक्तीचा वापर करून निवडून येऊन संस्था पुन्हा मागील दिवस पुढे न आणता जनशक्तीतून सर्वसामान्य होतकरू युवकांना संधी मिळावी.
-सूरज चौधरी, माजी सरपंच पेठ