नवी दिल्ली – पाच राज्यांत विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकार शेतकरी सन्मान निधीची रक्कम वाढवण्याची घोषणा करू शकते. सध्या एका शेतकरी कुटुंबाला वार्षाला 6 हजार रु. मिळतात. आता 8 हजार देण्याची तयारी आहे. यामुळे साडेआठ कोटी कुटुंबांना फायदा होणार आहे.
केंद्रातील सूत्रानुसार, याचा प्रस्ताव याच महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत आणला जाईल. याचदरम्यान, निवडणूक आयोगाने आचारसंहिता जाहीर केली तरीही केंद्र सरकार मंत्रिमंडळात प्रस्ताव मंजूर करून घेत निवडणूक संपल्यानंतर निर्णयाची घोषणा करू शकते. शेतकरी सन्मान निधी योजना 24 फेब्रुवारी 2019 पासून लागू करण्यात आली होती.
या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये 6 हजार रुपये वर्षाला मिळतात. 2019-20 मध्ये 9 कोटी, 2020-21 मध्ये 10 कोटी, 2021-22 मध्ये 11 कोटी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात वर्षाला 6 हजार रुपये ट्रान्सफर करण्यात आले. नंतर केंद्र सरकाराने आढावा घेतला असता पात्र लाभार्थींची संख्या 10.60 कोटी इतकी दिसली.
त्यानंतर केंद्र सरकारने पुन्हा एकदा लाभार्थींचा आढावा घेतला असता 8.51 कोटी लाभार्थीच खरे असल्याचे दिसून आले. म्हणजेच अडीच कोटी लाभार्थी बनावट आढळले. आता सरकारचे म्हणणे आहे की, रक्कम 2 हजार रु. वाढवल्याने केंद्राकडून दिली जाणारी एकूण रक्कम वाढणार नाही.
शेतकरी कुटुंबे किती?
यूपी : 1.86 कोटी
मध्य प्रदेश : 76.43 लाख
बिहार : 75.66 लाख
राजस्थान : 56.89 लाख
गुजरात : 45.18 लाख
छत्तीसगड : 20.24 लाख
हरियाणा : 15.37 लाख
झारखंड : 13.2 लाख