संगमनेर, (प्रतिनिधी) – डोंगराच्या पायथ्याशी शेळ्या चारणाऱ्या वयोवृद्ध व्यक्तीला चौघांनी चाकूचा धाक दाखवत झाडाला बांधून ठेवले. त्यानंतर त्यांच्या 21 शेळ्या, बोकड चोरून नेले. वयोवृद्ध व्यक्तीने स्वतःला सोडवून घेत घरी जाऊन घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला. शेळ्या चोरणाऱ्या मुलांचा शोध घेत असताना चौघांपैकी तिघांना पकडण्यात आले. मात्र, एक पळून गेला. हे सर्व भिवंडी येथील आहेत. ही घटना मंगळवारी संगमनेर तालुक्याच्या वेल्हाळे गावाच्या शिवारात घडली.
एराफ आलम अन्सारी (वय 19, रा. शांतीनगर तलाव, भिवंडी बायपास, भिवंडी, जि. ठाणे),अन्सारी सानिफ मुक्तार (वय 22, रा. कसाईवाडी, भिवंडी, जी. ठाणे), मोहम्मद माजीद अस्लम अन्सारी (वय १८, रा. शांतीनगर, भिवंडी, जी. ठाणे), जिशान (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या चौघांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात वामन देवजी दुधवडे (वय 65, रा. शेडेवाडी, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जीशान हा पळून गेला.
दुधवडे हे वेल्हाळे शिवारात मंगळवारी सकाळी डोंगराच्या पायथ्याजवळ 21 शेळ्या, बोकड घेऊन चारण्यासाठी गेले होते. तेव्हा चार मुले त्यांच्याजवळ आली. डोंगरावर जाण्यासाठी हाच रस्ता आहे का, अशी विचारणा त्यांनी केली. काही क्षणातच दुधवडे यांना पाठीमागून एकाने पकडले. दोघांनी त्यांचे हात धरले.
त्यांच्या तोंडाला रुमाल बांधून त्यांना निलगिरीच्या झाडाला बांधून चाकू दाखविला. त्यानंतर चौघेही 21 शेळ्या, बोकड चोरून घेऊन गेले. शेळ्या चोरणाऱ्या एकाला पोलिसांनी पकडले. पळून जाणाऱ्या दोघांना नागरिकांनी पाठलाग करून पकडले. पकडलेल्या तिघांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
तिघांना पोलीस कोठडी
शेळ्या चोरणारे भिवंडी येथील चौघेही कारमधून संगमनेरात आले होते. यातील दिशान हा कार (एम. एच.04.एल बी,0742) घेऊन पळून गेला. पकडलेल्या तिघांना न्यायालयासमोर उभे केले असता, 28 एप्रिलपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावल्याचे तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार यांनी सांगितले.