सणबूर – जिल्हयात सर्वात जास्त पाटण तालुक्यासह कराड तालुक्यीतल सुपने मंडलाला प्रतिवर्षी अतिवृष्टीच्या काळात आपत्तीचा सामना करावा लागतो.आपले तालुका प्रशासनाला तालुक्यातील आपत्ती परिस्थितीची कल्पना आहे. आपत्ती आलेनंतर तातडीने करावयाच्या उपाययोजना करणेकरीता आपण प्रतिवर्षी आपत्ती व्यवस्थापन व नियोजनाची बैठक घेत असतो. आपत्तीच्या काळात तालुका प्रशासनाने कोणताही हलगर्जीपणा करु नये ,जागृत रहावे अशा सुचना गृह राज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी तालुका प्रशासनाला दिल्या.
पाटण येथे आपत्ती व्यवस्थापन व प्राथमिक नियोजनासंदर्भात तालुका प्रशासनाची बैठक आयोजीत करण्यात आली होती याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पाटणचे प्रातांधिकारी सुनिल गाडे, कराडचे उतम दिघे, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक लावंड, तहसिलदार रमेश पाटील, कोयना धरणाचे कार्यकारी अभियंता एन.टी.पोतदार, कार्यकारी अभियंता बुंदिले कराडचे गटविकास अधिकारी यु.व्ही. साळुंखे यांच्यासह इतर खात्यातील अधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी प्रारंभी नामदार शंभूराज देसाईंनी कोयना धरण व्यवस्थापनाच्या अधिका-यांकडून मान्सुन काळात पडणा-या पावसामुळे कोयना धरणात होणा-या पाणीसाठयासंदर्भात व पुर्ण क्षमतेने पाणीसाठा झालेनंतर पाणी विर्सगासंदर्भातील सविस्तर माहिती घेवून कोयना धरण व्यवस्थापनाने योग्य नियोजन करावे असे सांगत उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे नियंत्रणाखाली तहसिल कार्यालय याठिकाणी 24 तास आपतकालीन व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात यावा. आपत्ती काळात तालुक्यामध्ये कोणत्याही ठिकाणी काही अडचण निर्माण झाल्यास तात्काळ या कक्षामध्ये माहिती देण्याचे काम अधिकारी यांनी करुन यावर तात्काळ तोडगा काढून आपतकालीन परिस्थिती दुर करावी.
तसेच प्रत्येक तालुका स्तरीय अधिकारी यांनी आपले विभागात 1 जुन पासूनच आपत्तकालीन कामासाठी अधिकारी,कर्मचारी यांची नेमणूक आपआपल्या कार्यालयामध्ये करुन संबधित अधिकारी व कर्मचारी यांचे दुरध्वनी क्रमांक तहसिलदार यांचेकडे देवून ते तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये प्रसिध्द करावेत. तहसिलदार यांनी मंडलाधिकारी,तलाठी यांचेमार्फत कोयना नदीकाठच्या गावांना या काळात सतर्क राहण्याच्या सुचना कराव्यात तसेच गटविकास अधिकारी यांनी ग्रामविस्तार अधिकारी, ग्रामसेवक यांना आपलेकडील गावांत सतर्क राहणेबाबत सुचित करुन त्या त्या विभागातील वैद्यकीय अधिकारी यांच्या संपर्कात राहून मान्सुन काळात साथीचे रोग पसरणार नाहीत याकरीताच्या उपाययोजना कराव्यात,पावसाळयामध्ये ग्रामीण आणि डोंगरी भागामध्ये साथीच्या रोगाबरोबर सर्पदंशाचे प्रमाण मोठया प्रमाणात पहावयास मिळत असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र,उपकेंद्र,ग्रामीण रुग्णालय याठिकाणी यावरचा औषधसाठा आताच करुन ठेवावा.प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांनी योग्य नियोजन करुन 24 तास अलर्ट राहवे. आपत्तकाळात रुग्णवाहिकेची व्यवस्था कशी होईल याची दक्षता घ्यावी यासह अन्य विभागांनबाबत सुचनाही ना. देसाई यांनी दिल्या.