नगर – नगर तालुक्यातील वाकोडी फाटा ते मोकाटे वस्ती मार्गे भिंगार येथील रहदारीच्या रस्त्यात करण्यात आलेले अतिक्रमण हटवून रस्ता खुला करुन देण्याच्या मागणीसाठी महिलांनी दरेवाडी ग्रामपंचायतीवर थाळीनाद करीत मोर्चा नेला.
या मोर्चात हरिभाऊ राहिंज, नीरज प्रजापति, बाळासाहेब बेरड, मारुती राहिंज, राजेंद्र राहिंज, बाबासाहेब राहिंज, नितीन राहिंज, आतीश राहिंज, सतीश राहिंज, संजय मोकाटे, रामदास राहिंज, नागेंद्र प्रजापति, रामदास मोकाटे, सतीश मोकाटे, रंजना घुगरे, उषा राहिंज, शोभा कवडे, छाया राहिंज, सपना राहिंज, रूपाली राहिंज, कल्पना राहील, वैशाली राहिंज, अनिता बेरड, मीनाक्षी राहिंज आदिंसह ग्रामस्थ सहभागी झाले होते.
खराब झालेल्या रस्त्यावरील चिखलातून पायपीट करीत महिलांचा मोर्चा दरेवाडी ग्रामपंचायतीवर धडकला. वाकोडी ते भिंगार रस्त्यालगत वस्ती करून मोठ्या संख्येने शेतकरी राहत आहे. यामध्ये 250 ते 300 कुटुंब वास्तव्यास आहे. नगर-सोलापूर रोडला येण्या-जाण्यासाठी वाकोडी-भिंगार रस्त्याचा वापर करावा लागतो. सदरचा रस्ता हा 25 वर्षापासून वापरात आहे. रस्त्याच्या पूर्व बाजूस राहणाऱ्या शेतकऱ्यांनी रस्त्यावर खड्डे खोदून व काटे टाकून अतिक्रमण करीत सदर रस्ता वाहतुकीस अडथळा निर्माण केला आहे.
पावसाळ्यामध्ये रस्ता अत्यंत खराब झाला असून, ग्रामस्थ स्वखर्चाने रस्त्याची दुरुस्ती करण्यास तयार असून, अतिक्रमण करणारे कुटुंबीय कामात अडथळा आणत आहे. या रस्त्यावरून ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक मार्गक्रमण करीत असतात. खड्डे व चिखलामुळे या रस्त्यावर अनेक लहान-मोठे अपघात घडत असून, एखाद्या रुग्णास किंवा गर्भवती महिलेस दवाखान्यात घेऊन जाण्यास मोठी कसरत करावी लागत आहे.
शेतकऱ्यांच्या शेती मालाची व जनावरांच्या चाऱ्याची वाहतुक करणारी गाडी देखील या भागात येऊ शकत नसल्याने ग्रामस्थांची मोठी पंचाईत झाली असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. ग्रामपंचायतीने सदर रस्त्याची पहाणी करुन झालेले अतिक्रमण त्वरीत हटवावे व रस्ता दुरुस्तीमधील अडथळा दूर करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा मंगळवारी (दि.27) नगर-सोलापूर महामार्गावर रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे.