राहाता -आव्हानात्मक परिस्थितीत अंगणवाडी सेविका माता, बाल संगोपनाचे करीत असलेले काम हे सामाजिक दायित्वाचे असून, अंगणवाडीतील मुलांना पोष्टीक बिस्कीट देण्याचा सुरु केलेला उपक्रम राज्याला प्रेरणा देणारा ठरेल, असा विश्वास भाजपचे ज्येष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
राहाता पंचायत समिती आणि जनसेवा फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यात कमी वयातील बालकांना पोष्टीक बिस्कीट देण्याचा उपक्रम राज्यात प्रथमच सुरु करण्यात आला. राहाता तालुक्यासह राहुरी आणि श्रीरामपूर तालुक्यातील अंगणवाडीमधील बालकांना प्रातिनिधीक स्वरुपात या पोष्टीक बिस्कीटांचे वितरण आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, सभापती नंदाताई तांबे, उपसभापती ओमेश जपे, माजी उपसभापती सुभाषराव विखे, संतोष ब्राम्हणे, सुवर्णा तेलोरे, गोरक्षनाथ तांबे, गटविकास आधिकारी समर्थ शेवाळे, गटशिक्षणाधिकारी पोपटराव काळे, शिक्षण विस्तार आधिकारी ज्ञानेश्वर वाकचौरे, प्रकल्प आधिकारी नागरे आदी याप्रसंगी उपस्थित होते. तसेच यावेळी माझी कन्या भाग्यश्री या योजनेतील पात्र लाभार्थ्यांना ठेव पावतीचे वितरणही करण्यात आले.
आ. विखे पाटील म्हणाले, तालुक्यात विकासाची प्रक्रीया सुरु असते. वैयक्तिक लाभाच्या योजनांची अंमलबजावणी होणे हे महत्वाचे आहे. तालुक्यात पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आधिकाऱ्यांमध्ये असलेल्या चांगल्या सुसंवादामुळेच योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होते. तालुक्यातील किशोरवयीन मुलीच्या आरोग्याची तपासणी करण्याची योजना शासनाने सुरु केली आहे. या योजनेची अंमलबजावणी सुरु करण्याची सुचना त्यांनी पंचायत समितीच्या पदाधिकारी आणि आधिकाऱ्यांनी केली.
जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील म्हणाल्या, सकस आणि चांगला आहार ग्रामीण भागातील मुलांना मिळावा यासाठी नाबार्डचे माजी चेअरमन डॉ.वाय.एस.पी थोरात यांनी हा उपक्रम राबविण्यासाठी प्रेरणा दिली. बालकांच्या प्रतिकार शक्तीचे, वजनाचे मूल्यमापन करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रास्ताविक गटविकास आधिकारी समर्थ शेवाळे यांनी तर सुत्रसंचालन शिक्षण विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर वाकचौरे यांनी केले.