लंडन – इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा पराभव झाला. मात्र, त्याचा फायदा पाकिस्तानला झाला आहे. आयसीसी कसोटी क्रमवारीत भारताचे अव्वल स्थान घसरले असून पाकिस्तानने पहिले स्थान मिळवले आहे.
तिसऱ्या सामन्यात भारताला डावाने पराभव पत्करावा लागला. या सामन्यापूर्वी भारतीय संघ कसोटी अजिंक्यपद कसोटी स्पर्धेच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर होता. भारताने पाकिस्तानला मागे टाकत अव्वल क्रमांक पटकावला होता. मात्र, या पराभवानंतर भारताची तिसऱ्या स्थानी घसरण झाली असून पाकिस्तानने अव्वल स्थान प्राप्त केले आहे.
पराभवानंतरही भारताचे पाकिस्तानपेक्षा जास्त गुण आहेत. भारताच्या खात्यात सध्या 14 तर पाकिस्तानच्या खात्यात 12 गुण आहेत, पण पाकिस्तानची विजयाची टक्केवारी भारतापेक्षा सरस आहे. पाकिस्तानची विजयाची टक्केवारी 50 असून भारताची 38.38 आहे. वेस्ट इंडिजचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर भारताचा तिसरा आणि इंग्लंडचा चौथा क्रमांक आहे.
इंग्लंडने तिसरा कसोटी सामना जिंकला असला तरी त्यांना चौथ्या स्थानावरच समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे आता या क्रमवारीसाठी चौथा सामना भारतासाठी महत्त्वाचा आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-1 बरोबरी झाली आहे.