पुणे -केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) इयत्ता बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असून, निकालासाठी अंतर्गत मूल्यमापनाचा आराखडा तयार करण्यासाठी 12 अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.
येत्या दहा दिवसांत आराखडा तयार करून तो सादर करण्याचे बंधनही समितीला घालण्यात आलेले आहे. देशात करोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षितता याचा विचार करून केंद्र शासनाने “सीबीएसई’च्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय 1 जून रोजी घेतला आहे.
त्यानंतर अंतर्गत मूल्यमापनाच्या निकषाद्वारे निकाल लावण्याचेही स्पष्ट करण्यात आले. दरम्यान “सीबीएसई’ बोर्डाचे परीक्षा नियंत्रक डॉ.सन्यम भारद्वाज यांनी निकालाच्या निकषांचा आराखडा तयार करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आल्याचे परिपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
चर्चा करण्यासाठी समितीची बैठकही होणार आहे. केंद्रीय शिक्षण विभागाचे सहसचिव विपिन कुमार, नवी दिल्लीतील शिक्षण संचालक उदित प्रकाश राय, केंद्रीय विद्यालय संघठन आयुक्त निधी पांडे
नवोद्योग विद्यालय समितीचे आयुक्त विनायक गर्ग, युजीसीचे अध्यक्ष प्रतिनिधी , छत्तीसगडचे शिक्षण संचालक रुबींदरजीत सिंग बरार, केंद्रीय शिक्षण मंत्रालयातील सांख्यिकीय विभागाचे पी.के.बॅनर्जी, एनसीईआरटीचे संचालकीय प्रतिनिधी ,
दोन शाळांचे प्रतिनिधी, “सीबीएसई” आयटीचे संचालक डॉ.अंर्थ्रीकश जोहरी, प्रशासकीय संचालक डॉ.जोसेफ इमॅन्युअल, परीक्षा नियंत्रक डॉ.सन्यम भारद्वाज आदींचा समितीत समावेश करण्यात आलेला आहे. या समितीचा आराखडा इतर सर्वच राज्यातील बोर्डाच्या निकालासाठी निश्चितच मार्गदर्शक ठरणार आहे. त्यामुळे निकालासाठी काय काय निकष काय निश्चित होणार याकडे विद्यार्थी, पालक, शिक्षक या सर्वांचे लागले आहे.