कोलकाता – भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा करार वाढवला असला तरीही राहुल द्रविड याच्यावरचे दडपण कमी होणार नाही उलट वाढत जाणार आहे, असे मत भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने व्यक्त केले आहे. यंदाच्या वर्षी भारतात पार पडलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेनंतर द्रविडचा करार संपला होता, त्यात बीसीसीआयने वाढ केल्याचे समजल्यावर मला आनंद झाला, असेही गांगुली म्हणाला.
जेव्हा रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपला तेव्हा मला द्रविडने या पदावर यावे यासाठी खूप मनधरणी करावी लागली होती. त्याला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या (एनसीए) संचालकपदावरच कायम राहायचे होते. मात्र, मी त्याला भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी राजी केले. त्यावेळीही त्याने या पदावर जास्त काळ राहणार नाही असे सांगितले होते. मात्र, जस जसा तो खेळाडूंमध्ये रमला तसे तो बदलला. त्यालाही हे पद हाताळताना आनंद व अभिमान वाटत होता. हे त्याने स्वतःही सांगितले होते.
यंदाच्या वर्षी झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाला विजेतेपदापासून वंचित राहावे लागले असले तरीही त्यांची कामगिरी सरसच झाली. खेळाडूंमध्ये सकारात्मकता व यशाचा विश्वास निर्माण करणे सोपी गोष्ट नव्हती ती द्रविडने लिलया करुन दाखवली. आता पुढील वर्षी वेस्ट इंडिज व अमेरिकेत होत असलेल्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत द्रविडच्याच मार्गदर्शनाखाली भारतीय संघ निश्चितच विजेतेपद मिळवेल, असा विश्वासही गांगुलीने व्यक्त केला.
विश्वकरंडक स्पर्धेतील पराभव द्रविडलाही सतावेत असेल. मात्र, आता त्या मानसिकतेतून बाहेर येत दक्षिण आफ्रिका दौर्यावर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. आजपर्यंत भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकू शकलेला नाही. यंदा सुवर्णसंधी आहे. मात्र, त्याचे दडपण खेळाडूंपेक्षाही जास्त प्रशिक्षक म्हणून द्रविडवरच राहणार आहे, असे गांगुली म्हणाला.
रोहित-कोहलीवर मदार
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत आपली यंदा कामगिरी चांगली होइल असे दिसते, कारण भारतीय कसोटी संघ फलंदाजी व गोलंदाजीच्या बाबतीत जास्त सशक्त आहे. त्यातही मर्यादीत षटकांच्या मालिकेतून माघार घेतलेले नियमित कर्णधार रोहित शर्मा व विराट कोहली कसोटी संघात परततील व त्यांच्यावरच आपली मुख्य मदार राहील, असेही गांगुली म्हणाला.