T20 World Cup 2024, Team India : लवकरच सुरू होणारा टी-20 विश्वचषक 1 जूनपासून वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये खेळवला जाणार आहे. सर्व संघांना 1 मे पर्यंत आपापल्या संघांची घोषणा करायची आहे. अशा स्थितीत सर्वांच्या नजरा जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांक असलेल्या टी-20 संघावर खिळल्या आहेत की, भारत कोणत्या खेळाडूंसह विश्वचषकात प्रवेश करेल. आता मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर लवकरच 15 खेळाडूंचा संघ निवडण्यासाठी ( BCCI Selectors To Soon Announce India Squad For T20 World Cup 2024 ) एक बैठक घेणार आहेत, त्यानंतर विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा केली जाईल.
दैनिक जागरणच्या रिपोर्टनुसार, सर्व निवडकर्ते 27 किंवा 28 एप्रिल रोजी दिल्लीत बैठक घेऊ शकतात. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना 27 एप्रिल रोजी अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे, त्यामुळे भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा देखील दिल्लीत उपस्थित राहणार आहे. रिपोर्टनुसार, रोहित शर्मा आणि सर्व निवडकर्ते टी-20 विश्वचषक 2024 साठी संघाच्या निवडीला मान्यता देऊ शकतात. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर सध्या स्पेनमध्ये सुट्टीवर असून 27 किंवा 28 एप्रिल रोजी दिल्लीत येऊन थेट बैठकीत सहभागी होतील.
कर्णधार रोहित शर्माशिवाय विराट कोहली, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, ऋषभ पंत, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज हे विश्वचषकासाठी अमेरिकेला जाणे जवळपास निश्चित असल्याचा दावा या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. हे सर्व खेळाडू तंदुरुस्त राहिल्यास ते विश्वचषकात नक्कीच खेळतील. दरम्यान, हार्दिक पांड्या अडचणीत सापडला आहे. त्याच्या संदर्भात अशी बातमी समोर आली आहे की; मुंबई इंडियन्ससाठी तो कशी कामगिरी करतो, याच्याआधारे त्याची निवड केली जाईल; जी कामगिरी आतापर्यंत चांगली झालेली नाही.
भारत पहिला सामना कधी खेळणार?
T20 विश्वचषक 2024 मध्ये 20 संघ सहभागी होतील, जे प्रत्येकी 5 संघांच्या 4 गटांमध्ये विभागले गेले आहेत. भारतीय संघाला अ गटात ठेवण्यात आले असून त्यात पाकिस्तान, अमेरिका, कॅनडा आणि आयर्लंडचाही समावेश आहे. भारतीय संघ 5 जूनपासून विश्वचषक मोहिमेला सुरुवात करणार आहे, जिथे त्यांचा पहिला सामना आयर्लंडशी होणार आहे. कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान 9 जूनला भिडणार आहेत.