नगर – आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराज यांचा 726वा संजीवन समाधी सोहळा आणि कार्तिकी वारी सोहळा दि. 5 डिसेंबर ते 12 डिसेंबर दरम्यान पार पडणार आहे. 9 डिसेंबरला कार्तिकी एकादशी तर 11 डिसेंबरला माऊलींचा समाधी सोहळा आहे. दरम्यान या सोहळ्यासाठी शिर्डीवरून आळंदीकडे येणाऱ्या दिंडीतील भाविकांना अपघात झाला आहे. भरधाव कंटेनर दिंडीत घुसल्याने चार वारकरी ठार झाले असून 8 जण जखमी झाले आहेत.
हा अपघात रविवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावर खंदरमाळवाडी परिसरात घडला. कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ताराबाई गंगाधर गमे (रा. कोऱ्हाळे, ता. राहता), भाऊसाहेब नाथा जपे (रा. कानकुरी,ता. राहाता) बबन पाटील (रा. राहता ) , बाळासाहेब गवळी (रा . कोपरगाव ) अशी मृतांची नावे आहेत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शिर्डीपासून काही अनंतरावर निमगाव येथे संत ज्ञानेश्वर महाराजांचे मंदिर आहे. दरवर्षी तेथून शिर्डी ते आळंदी पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले जाते. यासोहळ्यात परिसरातील भाविक सहभागी होत असतात. भाविकांना झालेल्या अपघातामुळे हळहळ व्यक्त होत आहे.