नगर -राज्याच्या राजकारणात नगर जिल्ह्याचा नेहमीच दबदबा राहिला. पक्ष कोणताही असो त्या पक्षात नगर जिल्ह्याच्या कारभाऱ्यांनी आपला दबदबा कायम ठेवला. आताही राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नगर जिल्ह्याची विशेष जबाबदारी सोपविण्यात आली. अर्थात नगर जिल्ह्यातील भाजप नेत्याच्या दृष्टीने हा निर्णय म्हणजे थोडी खुशी अन् थोडा गम अशी म्हणावी लागेल.राज्याचे नेतृत्व करणारे भाजपमध्ये अनेक नेते जिल्ह्यात असतांनाही ते जिल्ह्याचे नेतृत्व करण्यास अपयशी ठरले किंवा त्यांनी आपले वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांनी संघटनेकडे दुर्लक्ष केले. त्यांना आता वेसन घालण्याचे काम फडणवीस करतील, तसेच निष्ठावंतांना पुन्हा पक्षाच्या प्रवाहात आणून ताकद देतील, असे बोलले जात आहे. त्यामुळे फडणवीस यांच्याकडे देण्यात आलेली नगर जिल्ह्याच्या जबाबदारीतून भाजपचे नेते लक्ष्य होणार की राष्ट्रवादीला सुरुंग लावला जाणार हे आता आगामी निवडणुकांमधून स्पष्ट होईल.
फडणवीस यांच्यावर सोपविलेल्या जबाबदारीमुळे जिल्ह्यातील निष्ठावंत भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आंनदाचे वातावरण पसरले आहे. आजवर मुंबईत जावून व्यथा मांडावी लागत होती. पण ती मांडली तरी त्याचा उपयोग होत नव्हता. पण आता ज्यांच्याकडे व्यथा मांडल्या जात ते आता नगर जिल्ह्याचे कर्ता आणि करवीता असल्यामुळे थेट तालुका पातळीवरील कार्यकर्त्यांना संवाद साधता येणार आहे. त्यामुळे पक्षविरोधी काम करणाऱ्यांना यातून चपराक बसणार असल्याचे पक्षात बोलले जात आहे. सन 2014 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत अनेक मातब्बर नेत्यांनी पक्ष प्रवेश केला. ते पक्षात आल्यानंतर खासदार व आमदार देखील झाले. परंतु सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाला समोरे जावे लागले. सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचा विजय झाला असला तरी विधानसभा निवडणुकीत मात्र विद्यमान पाच आमदार पराभूत झाले. यावर पक्षपातळीवर अनेक वेळा विचारमंथन झाले. पण सुधारणा काही झाली नाही. उलट संघटना पातळीवर पक्ष आणखी खिळखिळा होत असल्याचे चित्र दिसू लागले.
राज्याचे मुख्यमंत्री होण्याची क्षमता, अनेक वेळा मंत्री, तसेच पुर्वीच्या पक्षात प्रदेशाध्यक्ष, तालुक्यात एक हाती सत्ता असे मातब्बर नेते भाजपमध्ये आल्यानंतरही सन 2019 च्या विधानसभेत पक्षाचे विद्यमान पाच आमदारांचा पराभव झाला. सत्ताच्या स्पर्धेत पाडापाडीचे राजकारण काही लपून राहिले नाही. तरी जिल्ह्यात भाजपच्या नेत्यांमध्ये बदल काही झाला नाही. उलट विद्यमान आमदारांच्या मतदारसंघात लक्ष घालून आपल्या कार्यकर्त्यांचे (मूळ भाजप कार्यकर्त्यांना बाजूला ठेवून) स्थान बळकट करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे भाजपमध्ये चांगलीच अस्वस्थता पसरली आहे. ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न झाला, पण हा प्रयत्न हाणूण पाडण्यात आला. मात्र आता फडणवीस नगर जिल्ह्याचे नेतृत्व करणार असल्याने पक्षातील अशा प्रवृत्तींना आळा बसेल, असे बोलले जात आहे.
नव्याने पक्षात आलेल्यांमुळे पक्षातून मूळ भाजपचे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते बाजूला गेले आहेत किंवा त्यांना बाजूला सारून नव्याने आलेल्यांना स्थान मिळाले आहे. त्यामुळे पक्षात जुना व नवा वाद यापूर्वी रंगला असला तरी त्यातून पक्षाची चांगलीच वाताहत झाली आहे. एवढे दिग्गज व मातब्बर नेते पक्षात आल्यानंतरही पक्षाची ताकद वाढण्याऐवजी कमी झाली आहे. राज्यात एकमेव असा जिल्हा होता की, नव्याने दिग्गजांनी भाजपचा झेंडा घेतला होता. त्यामुळे राज्यात सर्वाधिक जागा जिल्ह्यात येणार असे समीकरण असतांना विद्यमान पाच आमदार पराभूत होतात. अर्थात विद्यमान आमदारांच्या चुका असतील, म्हणून त्यांना जनतेने नाकारले असले तरी पाडापाडीचे राजकारण देखील तेवढेच महत्वाचे ठरले आहे. त्यामुळे फडणवीस यांच्याकडे टाकलेली नगर जिल्ह्याची जबाबदारी जिल्ह्यात भाजपच्या दृष्टीने महत्वाची मानली जात आहे.
गोव्यातील यशाचा प्रत्यय जिल्ह्यात दिसणार का
<नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत गोव्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपविली होती. ती त्यांनी यशस्वी पार पाडून गोव्यात भाजपची सत्ता स्थापन केली. त्याच धर्तीवर नगर जिल्ह्यात राजकीय व्यूहरचना आखून सन 2024 ला लोकसभा व विधानसभेत पक्षाला यश मिळवून देतील, असा विश्वास पक्षाच्या निष्ठावंतांनी व्यक्त केला आहे. अर्थात जिल्ह्यात मातब्बर नेते असतांनाही आता फडणवीस यांना जिल्ह्याकडे खासबाब म्हणून लक्ष द्यावे लागणार आहे, ही त्याचे खऱ्या अर्थाने जिल्ह्यातील भाजपच्या नव्या व जुन्या नेत्यांसह कार्यकर्त्यांना आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. त्यामुळे सध्या तरी काही नेते अस्वस्थ झाले आहेत.
फडणवीस जिल्ह्याला वेळ देणार का
<विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्याची मोठी जबाबदारी आहे. भाजपच्या कोअर कमिटीतील सर्वच नेत्यांवर जिल्ह्याची विशेष जबाबदारी टाकली आहे. त्यात फडणवीस यांच्याकडे नगर व सोलापूर या दोन जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे. नगर जिल्हा सोपा नाही.त्यामुळे येथील नेत्यांवर अंकूश ठेवणे म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखे आहे, असे असतांना फडणवीस हे नगर जिल्ह्यात पक्ष वाढीबरोबर आगामी निवडणुका जिंकण्याची व्यूहरचना आखणार आहेत. मात्र, राज्याची धुरा सांभाळताना त्यांना नगर जिल्ह्यासाठी खास वेळ देता येणार आहे का, हा खरा प्रश्न आहे. नाही तर या मुंबईला असे म्हणून तेथूनच जिल्ह्याचे कामकाज केले तर.
========================