सिडनी – एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेपाठोपाठ हार्दिक पंड्याने टी-20 सामन्यांच्या मालिकेतही वर्चस्व राखले. अशा खेळाडूला आगामी कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठीही भारतीय संघात घ्यायला हवे, अशी अपेक्षा ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटीपटू शेन वॉर्न याने व्यक्त केली आहे.
या दोन्ही मालिकांनंतर आता भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी सज्ज झाला आहे. येत्या 17 डिसेंबरपासून ऍडलेडला या मालिकेतील पहिली कसोटी सुरू होणार आहे. ही या मालिकेतील एकमेव दिवस-रात्र कसोटी असून परदेशात अशी कसोटी खेळण्याची भारतीय संघाची पहिलीच वेळ आहे. दोन्ही मालिकांमध्ये पंड्याने सातत्यपूर्ण कामगिरी केली असल्याने त्याचा कसोटी संघातही समावेश होणे गरजेचे आहे. त्याच्यासारखा अष्टपैलू भारतीय संघासाठी खूप मोलाचा ठरेल, असेही मत वॉर्नने व्यक्त केले.
गोलंदाजी करणार असेल तरच
पंड्याचे सातत्य पाहता कसोटी संघात त्याला स्थान निश्चितच द्यायला हवे. मात्र, तो केवळ एक फलंदाज म्हणून संघात जागा मिळवू शकत नाही. तो गोलंदाजीही करणार असेल तरच त्याला स्थान मिळेल, असे संकेत कर्णधार विराट कोहलीने दिले आहेत.
पंड्या नुकताच दुखापतीतून सावरला आहे. त्याने दीड वर्षांनंतर एकदिवसीय मालिकेत गोलंदाजी केली. मात्र, ती केवळ एक षटकाची गोलंदाजी उपयुक्त नाही. त्याने परिपूर्ण अष्टपैलू म्हणून संघात असावे असे मला वाटते, असेही कोहलीने स्पष्ट केले आहे.